पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने अलीकडेच पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये अनेक दहशतवादी संघटनांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. २१ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीचे काही विशेष तपशील इंडिया टुडेने मिळवले आहेत. भारतीय गुप्तचर संस्थांना आयएसआयचे अधिकारी आणि दहशतवादी संघटनांमध्ये झालेल्या या गोपनीय बैठकीची माहिती मिळाली. त्यानुसार, एजन्सींनी अलर्ट जारी केला आहे.

या अलर्टनुसार, बैठकीत आयएसआयने जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्याची योजना तयार केली होती. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना मारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मुख्यत्वे पोलीस, सुरक्षा दल, गुप्तचर खात्यांसोबत काम करणाऱ्या काश्मिरींना ठार मारण्याचे ठरले होते. आयएसआय अधिकारी आणि दहशतवादी गटांचे नेते यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत काश्मिरी नसलेल्या लोकांना आणि भाजपा तसेच आरएसएसशी संबंधित लोकांनाही मारण्यासाठी लक्ष्य म्हणून निवडण्यात आले होते. आयएसआयने काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण करण्यासाठी २०० लोकांची हिट-लिस्ट बनवून त्यांची हत्या करण्याची योजना आखली होती. भारत सरकारच्या जवळचे मीडिया कर्मचारी आणि भारतीय एजन्सी आणि सुरक्षा दलांचे स्रोत आणि माहिती देणाऱ्यांव्यतिरिक्त, या यादीत अनेक काश्मिरी पंडितांची नावे समाविष्ट आहेत.

हे हल्ले स्थानिकांनी दहशतवाद्यांना समर्थन म्हणून स्वतःच केले आहेत आणि यामध्ये दहशतवादी संघटनांचा सहभाग नाही, हे दर्शवण्यासाठी हे हल्ले घडवून आणण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली नसलेल्या दहशतवाद्यांचा वापर करण्यास आयएसआय आणि दहशतवादी संघटनांनी सहमती दर्शविली. “यासाठी उरी आणि तंगधार येथील नियंत्रण रेषेपासून पिस्तूल आणि ग्रेनेडची तस्करी केली जात आहे,” असं या अलर्टमध्ये म्हटले आहे. तसेच या बैठकीत, एक नवीन दहशतवादी संघटना तयार केली गेली आहे, जी भारतीय तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी या हत्या आणि हल्ल्यांची जबाबदारी घेईल, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.