Pakistan Soldier Arrest: पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असताना सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) मोठे यश मिळाले आहे. बीएसएफने राजस्थान सीमेवर एका पाकिस्तानी जवानाला अटक करुन ताब्यात घेतले आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये सुरक्षा दलांना हे यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, पाकिस्तानी जवान सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होता, त्यानंतर बीएसएफने त्याला रोखले आणि ताब्यात घेतले. तो कोणत्या उद्देशाने सीमा ओलांडत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर सध्या तणावाचे वातावरण आहे, भारत आणि पाकिस्तानमधील संबंध खूपच बिघडले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, सीमेवरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. या दरम्यान शनिवारी रात्री पाकिस्तानी जवानाला पकडण्यात आले आहे. बीएसएफने पकडेल्या या पाकिस्तानी जवानाची सध्या चौकशी सुरू आहे.
बीएसएफ जवान पाकिस्तानच्या ताब्यात
दरम्यान काही दिवसांपूर्वीच पाकिस्ताननेही एका बीएसएफ जवानाला पकडले होते. पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफच्या १८२ व्या बटालियनमध्ये तैनात पूर्णम साहू हे गणवेशात होते आणि त्यांच्याकडे त्यांची सर्व्हिस रायफल होती. बुधवारी त्यांनी चुकून भारतीय सीमा ओलांडल्याचे वृत्त आहे.
बीएसएफ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, साहू सीमेजवळ शेतकऱ्यांच्या एका गटाबरोबर त्यांना संरक्षण देण्यासाठी जात असताना ही घटना घडली. ते एका झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले आणि चुकून पाकिस्तानी हद्दीत घुसले. यानंतर त्यांना ताबडतोब पाकिस्तान सैन्याच्या जवानांनी ताब्यात घेतले.
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या या जवानाची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका करण्यासाठी भारतीय आणि पाकिस्तानी सीमा दलांनी एक बैठक आयोजित केली होती, परंतु कुटुंबाला त्याबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही. सध्या भारत पाकिस्तानवर सतत दबाव आणत आहे आणि बीएसएफ जवानाला सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
पाकिस्तान विरोधात भारताची कडक पाऊले
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता भारताने शनिवारी पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार, पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्देशानुसार भारताच्या ध्वजधारी जहाजांनाही पाकिस्तानातील बंदरांवर डॉकिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.