२८ फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात धगधगत असलेल्या युद्धाला अखेर पूर्णविराम मिळाला. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध संपवण्यासाठी एक ऐतिहासिक शांतता करार (MoU) झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक्स पोस्टवर सविस्तर माहिती देत पाकिस्तानमुळेच युद्ध कसं थांबलं याचं श्रेय घेतलंय.

काय आहे शाहबाज शरीफ यांची पोस्ट?

मी आनंदाने आणि समाधानाने हे जाहीर करतोय की, अमेरिका आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक ‘इस्लामाबाद सामंजस्य करारावर (Memorandum of Understanding – MoU)’ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या माननीय नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून, मध्यस्थ म्हणून मीही त्यास मान्यता दिली आहे. संबंधित सरकारांच्या सर्वोच्च स्तरावरील व्यक्तींच्या या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या, त्यामुळे इराण आणि अमेरिका हा संघर्ष दोन्ही देशांना संपवायचा होता ही बाब अधोरेखित झाली आहे. इस्लामाबाद सामंजस्य करार तातडीच्या प्रभावाने लागू होईल. कराराच्या पहिल्या टप्प्यात, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करेल आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने तातडीने नौदल नाकेबंदी उठवतील.

डोनाल्ड ट्रम्प यांंचं मनःपूर्वक अभिनंदन- शाहबाज शरीफ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मी मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक कौतुक करतो. राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याची त्यांची ठाम बांधिलकी आणि शांततापूर्ण समाधानाला दिलेलं प्राधान्य यामुळे पुन्हा एकदा संघर्ष संपुष्टात आला आहे, जो या प्रदेशासाठी आणि जगासाठीही अत्यंत विनाशकारी ठरू शकला असता. या ऐतिहासिक यशामध्ये मोलाचे योगदान दिल्याबद्दल अमेरिकेच्या वाटाघाटी करणाऱ्या समूहाचं मी कौतुक करतो. जे. डी. व्हान्स, स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आणि अमूल्य योगदानामुळे हा करार शक्य झाला. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद मोजतबा खामेनेई आणि राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याबद्दल मी गाढ आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो. शांततेच्या मार्गाचा स्वीकार करताना त्यांनी दाखवलेले शहाणपण, दूरदृष्टी आणि राजकीय नेतृत्व निश्चितच उल्लेखनीय आहे. इराणच्या वाटाघाटी पथकाचेही मी विशेष कौतुक करू इच्छितो. मोहम्मद बाघेर गालिबाफ, अब्बास अराघची आणि एस्कंदर मोमेनी यांनी दाखवलेला संयम, चिकाटी आणि विधायक संवादासाठीची त्यांची बांधिलकी यामुळे हा करार प्रत्यक्षात साकार होण्यास महत्त्वपूर्ण मदत झाली असंही शाहबाज शरीफ म्हणाले आहेत.