पीटीआय, श्रीनगर/जम्मू
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाकिस्तानी सैन्याने बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील सीमावर्ती जिल्हा पूंछमध्ये केलेला अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे पूंछ जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले. गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात ९ जणांचा मृत्यू झाला तर २८ जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाकिस्तानी सैन्याने केवळ पूंछपुरता मर्यादित नव्हता तर जम्मू क्षेत्रातील राजौरी आणि कुपवाडा जिल्ह्यातील उरी, कर्नह आणि तंगधार सेक्टरमध्येही झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी हा क्रूर आणि भ्याड हल्ला असल्याचे सांगितले.
हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्करही जोरदार प्रत्युत्तर देत असल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली. दरम्यान, पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारामुळे लोकांना भूमिगत बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला. दरम्यान, मानकोटव्यतिरिक्त जम्मू प्रदेशातील राजौरी जिल्ह्यातील पूंछ, लाम, मंजाकोट आणि गम्बीर ब्राह्मणा येथील कृष्णा घाटी आणि शाहपूर सेक्टरमध्ये तसेच उत्तर काश्मीरच्या कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यातील कर्नाह आणि उरी सेक्टरमध्ये सीमेपलीकडून जोरदार गोळीबार करण्यात आला.
तोफगोळ्यांचाही मारा
६ आणि ७ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर आणि जम्मू काश्मिरातील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील चौक्यांवरून अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी तोफगोळ्यांचाही मारा करण्यात आला. मृतकांमध्ये पूंछ जिल्ह्यातील मानकोटमधील एका महिलेचाही समावेश आहे. या महिलेच्या घरावर एक मोर्टार आदळला होता. त्यात तिची १३ वर्षांची मुलगीही जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गोळीबारात पूंछमधील नऊ नागरिकही जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
जम्मूतील शैक्षणिक संस्था बंद
पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश जारी केले असल्याची माहिती विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी दिली.
पूंछमध्ये प्रचंड नुकसान
● भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाकिस्तानी सैन्याने बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील सीमावर्ती जिल्हा पूंछमध्ये केलेला अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांच्या मारामुळे पूंछ जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले.
● पहाटे दोन वाजता सुरू झालेल्या या गोळीबारात डझनभर घरांचे नुकसान झाले. स्फोटांच्या आवाजामुळे रहिवाशांना आश्रयासाठी धाव घ्यावी लागली.
● पाकिस्तानी सैन्याने मानकोट, मेंढर, थंडी कासी आणि पूंछ शहरातील डझनभर गावे आणि दाट लोकवस्ती असलेल्या नागरी भागांना लक्ष्य करीत केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात घरे, दुकाने उद्ध्वस्त झाली शिवाय पूंछ किल्ला आणि प्राचीन मंदिरांचेही नुकसान झाले.
● सततचा गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा यामुळे रहिवाशी प्रचंड दहशतीत होते.
● अनेक घरांचे नुकसान झाल्यामुळे धाकी येथील १५० हून अधिक रहिवाशांनी नातेवाईकांकडे आश्रय घेतला.
● पूंछमधील संयुक्त राष्ट्र केंद्र आणि वन विभागाच्या इमारतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.