Viral Video Of Pakistani Politician: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तान सातत्याने दहशतवाद्यांना वाढत्या पोसत असल्याने भारताने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत पाकिस्तान विरोधात लष्करी कारावाई करण्याच्या तयारीत आहे.

अशात आता, एका पाकिस्तानी राजकीय नेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हा राजकीय नेता, “जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर इंग्लंडला निघून जाईन”, असे म्हटल्याचे ऐकू येत आहे.

पाकिस्तानच्या नॅशनल अॅसेम्बीचे सदस्य शेर अफझल खान मारवत हे एका पत्रकाराशी संवाद साधत होते. तेव्हा पत्रकाराने त्यांना विचारले की, जर भारताशी युद्ध झाल्यास बंदूक घेऊन सीमेवर जाल का? यावर उत्तर देताना मारवत यांनी म्हटले की, “जर भारताशी युद्ध झाले तर मी इंग्लंडला जाईन.”

दरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माघार घ्यावी असे त्यांना वाटते का? असे विचारले असता, मारवत यांनी उपहासात्मकपणे म्हटले की, “मोदी माझ्या मावशीचा मुलगा आहेत का की, मी सांगितले म्हणून ते माघार घेतील?”

मारवत यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि अनेकांनी म्हटले की, पाकिस्तानी राजकारण्यांनाही त्यांच्या लष्करावर विश्वास नाही.

मारवत हे पूर्वी तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे सदस्य होते. पण, पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वावर वारंवार टीका केल्यामुळे इम्रान खान यांनी त्यांना पक्षाच्या विविध पदांवरून काढून टाकले होते.

२२ एप्रिल रोजी, पहलगामपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या बैसरन कुरणात दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटावर गोळीबार केला. यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कुरणात फक्त पायी किंवा घोड्यावरूनच जाता येते. पहलगाम हत्याकांड हा अलिकडच्या काळात काश्मीर खोऱ्यातील सर्वात घातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता. लष्कर-ए-तैयबाची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक राजनैतिक आणि धोरणात्मक प्रतिकारात्मक कारवाया केल्या आहेत. ज्यात पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध कमी करणे, प्रमुख सीमा मार्ग बंद करणे, सिंधू पाणी करार स्थगित करणे आणि पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करणे याचा समावेश आहे.

Live Updates