पीटीआय, श्रीनगर
भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे सातत्याने उल्लंघन सुरूच आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या या कुरापतीला भारतीय सैन्याकडूनही ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले जात आहे. गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत गोळीबार सुरूच होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पाकिस्तानी सैन्याने सीमेवरील पूंछ, राजौरी, उरीमधील सिलीकोट, बोनियार, कमलकोट, मोहरा आणि गिंगल, तर उरी, कुपवाडा, तंगधार आणि कर्नाह सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गुरुवारी रात्री झालेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात सीमेवरील गावांतील अनेक इमारतींसह, गुरुद्वारा, मशीद, मंदिर या धार्मिक स्थळांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
कूपवाडा, पूंछ येथे निवासी इमारतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथे गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात हनुमान मंदिराचे नुकसान झाले. तर एका सीमेवरील गावावर केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात गुरुद्वाराच्या भिंती कोसळल्या. हा गोळीबार पहाटे एक वाजताच्या सुमारास झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तथापि, गुरुद्वारा साहिब आणि येथील वैद्याकीय रुग्णालयाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थलांतर सुरूच
सीमेपलीकडून सुरू असलेल्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या राजौरी येथील रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्री गोळीबार सुरू होताच सुमारे २०० जणांनी बंकरमध्ये आश्रय घेतला होता. या बंकरमध्ये अद्यापही बरेच लोक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महिलेचा मृत्यू
जम्मू आणि काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने नागरी वस्त्यांवर केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या कुटुंबातील दोन सदस्य जखमी झाले. नर्गिस बेगम असे मृत महिलेचे नाव आहे.
जम्मूत दहशत
शुक्रवारी सकाळी जम्मू शहरात स्फोटांच्या आवाजामुळे प्रचंड दहशत पसरली होती. सीमेवरील भागातील भारताच्या लष्करी चौक्यांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उधळण्यात आल्यानंतर ही घटना घडली.
ऑनलाइन वर्ग
तणावामुळे काश्मिरातील सर्वच शैक्षणिक संस्था बंद आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून बहुतांश शाळांनी ऑनलाइन वर्गांचा अवलंब सुरू केला आहे.
भारताकडून हल्ले निष्प्रभ
नवी दिल्ली : पाकिस्तानने गुरुवारी रात्रभर आंतरराष्ट्रीय सीमा तसेच, प्रत्यक्ष ताबा रेषेवरील ३६ ठिकाणांवरून ३००-४०० ड्रोनच्या साह्याने भारताच्या लष्करी आस्थापनांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सर्व ड्रोन उद्ध्वस्त करून पाकिस्तानचे हल्ले भारताच्या लष्कराने निष्प्रभ केले, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी शुक्रवारी संरक्षण दल व परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
या हल्ल्यामध्ये तुर्की बनावटीचे ‘असिगार्ड सोंगर’ ड्रोन वापरल्याचे स्पष्ट झाले असून पाकिस्तानने भारताच्या आस्थापनांवर हल्ले केल्यानंतरही स्वत:ची हवाई हद्द खुली ठेवली होती. त्यामुळे नागरी प्रवासी विमानांना ढाल करून भारतावर हवाई हल्ले करण्याचा पाकिस्तानचा इरादा होता, ही बाबही उघड झाली असल्याचे कर्नल कुरेशी यांनी सांगितले.
तर पाकिस्तानची इतकी नैतिक घसरण झाली आहे की त्याची कल्पनाही करता येणार नाही, असा संताप परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी यांनी व्यक्त केला. पाकिस्तानने प्रार्थनास्थळांवर हल्ले केले. ७ मे रोजी पुंछमध्ये पाकिस्तानने प्रार्थनास्थळांना लक्ष्य करूनच गोळीबार केला, अशी माहिती मिस्राी यांनी पत्रकार परिषदेत दिली.