नवी दिल्ली : पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाया करून दहशतवादी हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले असताना, जगभरातील महत्त्वाच्या राष्ट्रांच्या सरकारांशी तसेच, प्रसारमाध्यमांशी संवाद साधून राजनैतिक दृष्टीने भारताची बाजू मजबूत करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सातत्याने प्रमुख देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या संपर्कात असल्यामुळे अमेरिका व ब्रिटन या देशांनी भारताला पाठिंबा व्यक्त केला आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हीड लामी यांच्याशी फोनवरून चर्चा केली व पाकिस्तानकडून होत असलेल्या हल्ल्यांची माहिती दिली. त्याआधी जयशंकर यांनी इटलीचे उपपंतप्रधान अॅन्टोनियो ताजानी यांच्याशीही फोनवरून संवाद साधला. यापूर्वी त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनाही माहिती दिली. सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री तसेच, इराणचे परराष्ट्र मंत्री दोघेही गुरुवारी अचानक भारतात येऊन दाखल झाले होते. त्यांनाही स्वतंत्रपणे जयशंकर यांच्याशी चर्चा केली. या राजनैतिक संवादांमुळे आंतरराष्ट्रीय मत भारताच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
संघर्षाशी अमेरिकेचा संबंध नाही : वान्स
न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तान संघर्षाशी आमचा संबंध नसल्याचे सांगितले. अमेरिका युद्धात सहभागी होणार नाही. ते मूलभूतपणे आमचे काम नाही, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वान्स यांनी सांगितले. हे दोन्ही अण्वस्त्रधारी देश एकमेकांशी मोठा संघर्ष करतील याबद्दल आम्हाला चिंता आहे, असेही एका वाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले.
आमचे दहशतवाद्यांशी युद्ध : विनय क्वात्रा
भारताचे युद्ध दहशतवाद्यांशी आहे आणि या दहशतवाद्यांच्या रूपातील ‘अमानवी राक्षसांना’ संपवून पहलगाम पीडितांना न्याय मिळवून दिला जाईल, असे अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय क्वात्रा यांनी सांगितले. भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचे त्यांनी समर्थन केले आणि दहशतवाद्यांना मोकळीक देणार नाही यावर त्यांनी भर दिला.