पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला

निवडणुकीत ऐनवेळी जातीवाद वाढवून जातीसाठी माती खायला लावायची आणि विकास मात्र ‘बारामती’चा करायचा हे राजकीय षड्यंत्र यावेळी चालणार नाही. सर्वसामान्य माणूस सुज्ञ झाला असून असे घृणास्पद डावपेच उधळून लावतील आणि भाजप महायुतीच्या उमेदवाराला विजयी करतील, असा दावा मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. गोपीनाथ मुंडे व बाबुराव आडसकर यांच्यात लढत झाली. मात्र मतदानानंतर दोघांनी एकमेकांना हसत हसत टाळी देतानाचे छायाचित्र त्या काळी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले होते. मतदान झाले की, राजकारण संपले, असा विचार आजकाल पाहायला मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ आडस येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांची सभा झाली. यावेळी रमेश आडसकर, आमदार सुरेश धस यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री मुंडे म्हणाल्या, चार वर्षांत महामार्ग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रेल्वे या दळणवळणाच्या मार्गातून विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वागीण विकासासाठी जलद आणि सुखकर प्रवास आवश्यक आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने पंधरा वर्ष सत्ता भोगून एक रस्ताही नीट केला नाही. माझा अपघात झाला तेव्हा बाबुराव आडसकर यांनी फोन करून विचारपूस केली होती. विरोधी नेत्याच्या मुलीबद्दलही आत्मीयता दाखवण्याचे मोठेपण पहिल्या पिढीमध्ये होते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.