CAA अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान अल्पवयीन तरुणाने गोळीबार केल्याचा मुद्दा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला की, जामियामध्ये गोळीबार करणाऱ्याला कोणी पैसा पुरवला?

जामिया परिसरात १७ वर्षीय या तरुणाने गुरूवारी दुपारी आंदोलकांकडे बंदूक रोखली होती. त्यानंतर त्याने गोळीबारही केला होता. तो सातत्यांनं ”यह लो आझादी” असं म्हणत होता. ”देश में जो रहेना होगा, वंदे मातरम् कहना होगा” आणि ”दिल्ली पोलीस जिंदाबाद” अशा घोषणाही तो तरूण गोळीबार करण्याआधी देत होता.

या घडनेच्या पाश्वभूमीवर राहुल गांधी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा मुद्दा उपस्थित केला आहे.

महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जामियाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी राजघाटपर्यंत शांतता मोर्चा काढण्याचे ठरवले होते. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात जामियाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आंदोलन सुरू केले. ते नंतर देशभर पसरले आणि जामियापासून काही अंतरावर असलेला शाहीन बाग हा परिसर आता आंदोलनाचा केंद्रबिंदू बनला आहे.

आणखी वाचा – जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून होणार सत्कार

जामिया येथेही आंदोलन कायम असून मोर्चा काढण्यासाठी गुरुवारी दुपारी हजारो विद्यार्थी जमले होते. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पोलीसच नव्हे तर शीघ्र कृती दलाचा ताफाही तैनात असताना हिंसाचाराची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर आंदोलन आणखी तीव्र झाले होते.