उत्तरप्रदेशातील लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत बहुजन समाज पक्ष (बसपा)च्या प्रमुख मायावती यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त केले. उत्तरप्रदेशात भाजपला ७१ जागा जिंकण्यात यश मिळाले असून, या जागांवर विजयाचा अर्थ म्हणजे उत्तरप्रदेशातील जनता भाजपच्या पाठिशी आहे असा होत नाही. उत्तप्रदेशातून फक्त ४८ टक्के लोकांनी भाजपला मतदान केले त्यामुळे उर्वरित ५२ टक्के लोकांचा कल लक्षात घेण्याजोगा असल्याचे मायावती यांनी सांगितले.
बसपच्या उत्तरप्रदेशातील कामगिरीबद्दल बोलताना गेल्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत बसप पक्षाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याने आपण समाधानी असल्याचे मायावतींनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना मायावती म्हणाल्या, ‘आमचे दलित मतदार पहिल्यापासून ‘बसप’सोबतच राहिले आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाला ३४ जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.भरकटत जाण्यापासून बाजूला राहिल्याने मी दलित मतदारांचे मनापासून आभार मानू इच्छिते.’ उच्चवर्णीय आणि मुस्लिम मतांमध्ये विभाजन झाल्याने या निवडणुकीत पक्षाला जागा जिंकता आल्या नाहीत’. तसेच युपीए सरकारशी जवळीक असणाऱ्या पक्षांना लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.