भारताला पाकिस्तानशी शांतता आणि सौहार्दाचे संबंध हवे असले तरी, कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितले. ते शनिवारी भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. पाकिस्ताना आमचा शेजारी देश आहे. आम्हाला पाकिस्तानच नव्हे तर शेजारच्या सर्व देशांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. आम्हाला शांतताही हवी आहे. मात्र, भारतावर कोणताही दहशतवादी हल्ले झाल्यास आम्ही त्याला सडेतोड प्रत्युत्तर देऊ, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भारतीय लष्कराने पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. देशाला लष्करातील जवानांचा अभिमान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. काही वेळापूर्वीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या हल्ल्याबदलची माहिती दिली.