पीडीपी व भाजपचा जनतेला मूर्ख बनवणे हाच समान कार्यक्रम आहे, अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकारी अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. लष्कराचा विशेषाधिकार, कलम ३७० या मुद्दय़ांवर आघाडी सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काश्मीरला विशेष दर्जा असणारे कलम ३७० रद्द करता येणार नाही असे ओमर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सुनावले. पीडीपी सत्तेसाठी तडजोड करत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. लष्कराला विशेषाधिकार आणण्यास फारुख अब्दुल्ला जबाबदार असल्याचा मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. विशेषाधिकार हटवण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा ओमर यांनी केला. मात्र तो हटवू शकलो नसल्याबद्दल ओमर यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र आता केंद्राकडून तुम्ही समान कार्यक्रमात काय आणणार आहात, असा सवाल त्यांनी पीडीपीला केला. आता तुमच्याकडे बहुमत आहे, केंद्रात सरकार आहे तेव्हा विशेषाधिकार हटवण्याची प्रक्रिया सुरू करा, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.