जे लोक कधी काश्मीरमध्ये राहिलेच नाहीत, तेच लोक आता काश्मीरी विस्थापितांसाठी लढा देत आहेत, अशा शब्दांत अभिनेते नसुरूद्दीन शहा यांनी अनुपम खेर यांची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडविली आहे. गेल्या काही दिवसांत साहित्य , कला आणि चित्रपटसृष्टीत सरकारच्या बाजुने आणि सरकारच्या विरोधात असे दोन गट पडल्याचे दिसत आहे. यामध्ये अनुपम खेर अनेकदा सरकारचे समर्थन करत असणाऱ्या गटाचे प्रतिनिधित्त्व करताना दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी नसिरूद्दीन शहा यांनी शनिवारी अनुपम खेर यांना अप्रत्यक्षपणे टीकेचे लक्ष्य केले. जे लोक कधी काश्मीरमध्ये राहिलेच नाहीत तेच लोक आज काश्मीरी पंडितांसाठी लढा देत असल्याचे शहा यांनी म्हटले. मात्र, यावेळी शहा यांनी सरकारला आणखी वेळ देण्याची गरज असल्याचेही सांगितले. लोक फार लवकर निर्णय आणि निष्कर्ष काढतात. आपण सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे. मात्र, काही गोष्टी चिंता करण्यासारख्या आहेत. ज्याप्रकारे पाठ्यपुस्तकांमधील माहितीमध्ये बदल आणि काटछाट करण्यात येत आहे, ते पाहता काळजी वाटते. मात्र, देशाला अंधारयुगाकडे नेण्याइतपत सरकार नक्कीच मुर्ख नाही, असे नसिरुद्दीन शहा यांनी सांगितले.