पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस घरांमध्ये दिवा लावण्याचं आवाहन केलं होतं. त्याचद्धतीचं आवाहन मोदींनी पुन्हा एकदा केलं असून यंदा १८ लाख दिवे लावण्यासंदर्भातील शब्द मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं मिळालेल्या लाभार्थ्यांकडून घेतलाय. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बोलताना केंद्र सरकारसोबतच उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या कामाचं तोंडभरुन कौतुक करताना कामांचा पाढा वाचतानाच दिवाळीमध्ये घरटी दोन दिवे लावा असं आवाहन केलं आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना मोदींनी, यंदा दिवाळीत आयोध्येमध्ये साडेसात लाख दिवे लावणार असल्याची माहिती मला आता देण्यात आली. मी उत्तर प्रदेशला आवाहन करतोय की राज्यामध्ये ज्यांना ज्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं मिळाली आहेत त्या ९ लाख लाभार्थ्यांनी आपआपल्या घरांमध्ये प्रत्येकी दोन दिवे लावावेत. म्हणजे अयोध्येमध्ये साडेसात लाख दिवे लागतील तेव्हा या घरांमध्ये १८ लाख दिवे लावले जातील. भगवान रामालाही याचा आनंद होईल असंही मोदी म्हणालेत.

सगळं लाभार्थीच ठरवतात
आम्ही या घरांच्या योजनांमध्ये फार सकारात्मक बदल केल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं. “२०१४ च्या आधी जे सरकार होतं त्यांनी शहरांमधील योजनांमध्ये केवळ १३ लाख घरं मंजूर केली. त्यापैकी ८ लाख घरं बनवण्यात आली. पीएम आवास योजनेअंतर्ग १ कोटी १३ लाखांहून अधिक घरांच्या उभारणीसाठी परवानगी दिली. ५० लाख घरं देण्यात आली. आम्ही घरांच्या डिझाइनपासून निर्मितीपर्यंत सर्व गोष्ट घरं वापरणाऱ्यांना ठरवायला सांगितलं. दिल्लीत एसी कार्यालयांमध्ये बसून आम्ही निर्णय घेतलेले नाहीत,” असं मोदी म्हणाले.

लोक लखपती झाले
“आम्ही घरं किती मोठी असतील याचा निर्णय घेतला. २२ स्वेअर मीटरपेक्षा घरं छोटं असणार नाही असं आम्ही ठरवलं. आम्ही थेट गरिबांना त्यांच्या खात्यांवर घरं बनवण्यासाठी पैसे पाठवले. केंद्राने जवळजवळ १ लाख कोटी रुपये गरिबांच्या खात्यांवर थेट पाठवलेत. आपल्याकडे काहीजण म्हणतात की मोदींनी केलं काय. मी पहिल्यांदाच तुम्हाला असं काही सांगू इच्छितो की माझे जे सहकारी आहेत जे झोपड्यांमध्ये राहत होते, ज्यांच्याकडे पक्कं घर नव्हतं अशा ३ कोटी घरांना या कार्यकाळामध्ये एकाच योजनेने लखपती होण्याची संधी मिळाली,” असंही मोदींनी नमूद केलं.

आधीच्या सरकारवर टीका
“देशात २५ ते ३० कोटी कुटुंब आहेत. तीन कोटी कुटुंब लखतपी झालेत. मला ते दिवसही आठवतात जेव्हा फार प्रयत्न करुनही उत्तर प्रदेश घरं बनवण्यामध्ये पुढे जात नव्हता. गरिबांना घरं बांधण्यासाठी केंद्र पैसे देत होते. योगी सरकार येण्याआधी जे सरकार होतं त्यांना गरिबांसाठी घरं बनवायची नव्हती. आधी जे होते त्यांच्याकडे आम्हाला विनंती करावी लागायची,” असं म्हणत मोदींनी आधीच्या सरकारवर टीका केली.

१८ घरं सुद्धा बनवून दिली नाही
“२०१७ आधी आम्ही युपीसाठी १८ हजार घरं निश्चित केली. मात्र येथील सरकारने १८ घरं सुद्धा बनवून दिली नाही. पैसा होता, परवानगी होती मात्र जे सत्तेत होते ते नेहमीच कामाच्या आड यायचे. त्यांचं हे कृत्य येथील लोक विसरणार नाही. योगी सरकार सत्तेत आल्यानंतर शहरांमधील ९ लाख गरिबांना घरं बांधून देण्यात आलीय. १४ लाख घरांचं बांधकाम सुरु आहे. वीज, पाणी, गॅस, शौचालय अशा सेवाही दिल्या जात आहेत,” असंही मोदींनी सांगितलं.