“काँग्रेसचे अत्याचार, भ्रष्टाचार आणि देशाच्या संस्कृतीचा ऱ्हास यामुळे निर्माण झालेले निराशेचे वातावरण संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भगवान राम आणि कृष्णासारखा देवाचा अवतार म्हणून जन्म झाला,” असं वक्तव्य मध्य प्रदेशचे कृषिमंत्री आणि भाजप नेते कमल पटेल यांनी केलंय. हरदा येथे बोलताना पटेल म्हणाले की, “पंतप्रधान मोदींनी भारताला विश्वगुरू बनवण्याच्या मार्गावर नेणे, देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे, लोककल्याणाची हमी देण्यासारखी जी कामे पूर्ण केली आहेत, ती सामान्य माणसाच्या हातून होऊ शकत नाहीत.” पटेल म्हणाले, "आपल्या धर्मात आणि संस्कृतीत असे सांगितले गेले आहे की जेव्हा जेव्हा भारतावर संकट येते आणि अत्याचार वाढतात तेव्हा देव माणसाच्या रूपात अवतार घेतात. प्रभू रामाने मानवाच्या रूपात अवतार घेतला आणि रामराज्याची स्थापना केली. रावण या राक्षसाचा वध करून आणि इतर वाईट शक्तींचा पराभव करून लोकांचे रक्षण करून राज्य स्थापन केले. कंसाचे अत्याचार वाढले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने जन्म घेऊन कंसाचे क्रौर्य संपवून सर्वसामान्यांना दिलासा दिला. भारतातील संस्कृती जेव्हा नष्ट झाली आणि चौफेर निराशेचे वातावरण निर्माण झाले, तेव्हा ते संपवण्यासाठी नरेंद्र मोदींचा जन्म झाला. भ्रष्टाचारमुक्त सरकार देणारे आणि सर्वसामान्यांचे कल्याण करणारे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू होत आहे.” एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिलंय. "ही अशक्य कामे आहेत जी सामान्य माणूस पूर्ण करू शकत नाही. शक्य असल्यास, ते पूर्ण होण्यासाठी ६० वर्ष लागली असती. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अवतारी पुरुष आहेत आणि त्यांनी अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. ते देवाचा अवतार आहे,” असे म्हणत पटेल यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय.