Rahul Gandhi on PM Modi: अमेरिकेबरोबर भारताने व्यापार करार केल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज मंगळवारी सुरू झाल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे दोन वेळा कामकाज स्थगित करण्यात आले होते. दिवसभरासाठी कामकाज तहकूब केल्यानंतर राहुल गांधींनी संसदेच्या बाहेर माध्यमांशी बोलत असताना पंतप्रधान मोदींवर टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, “मला सभागृहात बोलू दिले जात नाही. पंतप्रधान मोदी घाबरलेले आहेत. जो व्यापार करार चार महिन्यांपासून रखडला होता, त्यात काहीच बदल न करता स्वाक्षरी केली गेली आहे. जे मला माहीत आहे, ते पंतप्रधान मोदींनाही माहीत आहे. पंतप्रधानांनी काल सायंकाळी करारावर स्वाक्षरी केली. त्यांच्यावर खूप दबाव आहे.”

मोदींच्या प्रतिमेचा फुगा फुटला

“पंतप्रधान मोदींची प्रतिमा निर्माण करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. पण त्या प्रतिमेचा फुगा फुटू शकतो, अशी त्यांना भीती वाटते. मुख्य म्हणजे, आपल्या पंतप्रधानांना तडजोड करण्यासाठी भाग पाडले गेले. हे कुणी केले, कसे केले, याचा विचार भारताच्या जनतेने करावा. पण इतिहासात पहिल्यांदा विरोधी पक्षनेत्याला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलू दिलेले नाही”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

पंतप्रधान मोदींनी देश विकला

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुढे म्हणाले, “भारतातील शेतकऱ्यांच्या घामाला पंतप्रधान मोदींनी विकले आहे. त्यांनी फक्त शेतकरी आणि सामान्य लोकांना नाही तर देशालाही विकले आहे. यासाठीच मला सभागृहात बोलू दिले जात नाही. पंतप्रधान मोदी घाबरलेले आहेत. कारण ज्या लोकांनी त्यांची प्रतिमा तयार केली होती, ती भंग पावली आहे.”

अमेरिकेने अदाणींना नाही तर पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले

“पंतप्रधान मोदींवर कोणता दबाव आहे? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता राहुल गांधी यांनी याचे उत्तर दिले. ते म्हणाले, गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेत खटला दाखल आहे. हा खटला अदाणींना लक्ष्य करत नाही. तर तो पंतप्रधान मोदींच्या आर्थिक ढाच्याला लक्ष्य करत आहे. दुसरा विषय एपस्टीन फाईल्सचा आहे. त्यात अजून बऱ्याच गोष्टी आहेत. बराच भाग अजून प्रसिद्ध झालेला नाही. अदाणींवर असलेला खटला हा मोदींवरचा खटला आहे”, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.