डेहराडून : केंद्रातील आणि उत्तराखंडमधील याआधीच्या काँग्रेस सरकारांनी या राज्याला विकासापासून दूर ठेवले. विकास प्रकल्प राबवण्यास या राज्यांनी विलंब केला. त्यामुळे या राज्यातील ग्रामीण भागांतील नागरिकांवर अन्य राज्यांत आणि शहरांमध्ये स्थलांतर करण्याची वेळ आली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीनिमित्त हल्दवानी येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने कोणताही विकास न करता केवळ या राज्याला लुटण्याचे काम केले. उत्तराखंडच्या ग्रामीण भागांत रस्ते आणि अन्य प्रकल्पांचा अभाव आहे. रोजगार नसल्याने ग्रामीण भागांतील तरुणांना आपले घर सोडावे लागले, अशी टीका मोदी यांनी केली. मोदी यांनी यावेळी १७,५०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यातील लखवार हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी ५,७४७ रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लखवार प्रकल्प हा १९७४मधील असूनही काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे तो पूर्ण झाला नाही. ४६ वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण होत आहे, असे मोदी म्हणाले. हा प्रकल्प जर लवकर पूर्ण झाला असता तर उत्तराखंडच्या डोंगराळ भागांतील नागरिकांची वीज, पिण्यासाठी आणि शेतीसाठीच्या पाण्याची समस्या लवकरच सुटली असती, असे पंतप्रधानांनी सांगितले.