भारत व श्रीलंका यांच्यात शुक्रवारी चार करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून भारतीय पंतप्रधानांची २८ वर्षांनंतर पहिलीच श्रीलंका भेट आहे. पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेबरोबरचे संबंध आणखी सुधारण्यासाठी काही निर्णयही जाहीर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन देशांच्या दौऱ्यासाठी श्रीलंकेत आगमन झाले, त्यांनी अध्यक्ष मथिरीपाल सिरिसेना यांची भेट घेऊन द्विपक्षीय विषयांवर चर्चा केली.
या भेटीचे महत्त्व आपल्याला ठाऊक आहे, १९८७ नंतर प्रथमच भारतीय पंतप्रधान म्हणून द्विपक्षीय भेटीसाठी आपण येथे येत आहोत असे मोदी यांनी सिरिसेना यायंच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. जानेवारीत श्रीलंकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सिरिसेना पहिल्या परराष्ट्र दौऱ्यात भारतात आले होते.
पंतप्रधान म्हणाले की, सिरिसेना यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे त्यामुळे दोन्ही देशातील संबंध सुधारतील याबाबत आपला  आशावाद उंचावला आहे.
दोन्ही देशांनी व्हिसा, अबकारी कर, युवक विकास व रवींद्रनाथ टागोर स्मारक या विषयांवरील चार करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही देशात अबकारी कर अधिकाऱ्यात सहकार्य राहणार असून त्यामुळे व्यापारातील अडथळे दूर होतील असे त्यांनी सांगितले.
मोदी म्हणाले की, दोन्ही देशांनी केलेली प्रगती ही भक्कम आर्थिक सहकार्याचे द्योतक आहे. दहा वर्षांत दोन्ही देशातील व्यापारही वाढला आहे पण भारताशी व्यापारात काही अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील. त्रिंकोमालीला पेट्रोलियम शहर बनवण्यात भारत पुढाकार घेण्यास तयार आहे व श्रीलंकेतील रेल्वेसाठी ३१८ दशलक्ष डॉलरचे कर्ज देण्यात येईल, त्यामुळे तेथील रेल्वे मार्ग सुधारता येतील.