PM Narendra Modi Interview : भारतात उत्पादन, सेवा क्षेत्र आणि लघु व मध्यम उद्योगांत बळकटी आल्याने इतर देशांबरोबर व्यापार सहजरित्या वाटाघाटी करता आल्या. राजकीय स्थिरता आणि राजकीय अंदाजामुळे भारतातील गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा निर्माण झाला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पाबाबत आज मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
३८ विकसित राष्ट्रांबरोबर करार
गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) या भारत आणि मध्य पूर्वेकडील सहा देशांच्या गटाने मुक्त व्यापार करारासाठी औपचारिकपणे वाटाघाटी सुरू करण्यासाठी आधीच अटींवर स्वाक्षरी केली आहे. यासह, सरकारने गेल्या काही वर्षांत तब्बल नऊ व्यापार करारांना अंतिम स्वरूप दिले आहे, ज्यामध्ये ३८ विकसित राष्ट्रांचा समावेश आहे, असं मोदी म्हणाले.
आता नाही तर कधी नाही
यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे भारताला विकसित राष्ट्रात रुपांतरीत होण्याच्या तयारीचे संकेत देणारा आहे. आता नाही तर कधीच नाही, असा हा अर्थसंकल्प असून याच प्रेरणेतून निर्माण झालेला आम्ही तयार आहोत, असा हा क्षण आहे, असं मोदी म्हणाले.
बायोफार्मा, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन, केमिकल पार्कसारख्या उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा अर्थसंकल्पात समावेश आहे. यामुळे भारताचं भविष्य बळकट होऊन नोकऱ्या आणि गुंतवणुकीला एक नवीन चालना मिळेल, असंही मोदी म्हणाले. सरकारने राष्ट्र उभारणी आणि आर्थिक बळकटीकरणाच्या मार्गदर्शनाखाली एक समावेशक, तंत्रज्ञानचलित परंतु मानव केंद्रित कल्याणकारी वास्तुकला तयार केली आहे, जी शेवटपर्यंत पोहचत आहे, असंही मोदींनी स्पष्ट केलं.
युपीए सरकारवर टीका
मागील यूपीए सरकारवर टीका करताना पंतप्रधानांनी असा आरोप केला की आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे भारताची वाटाघाटी करण्याची क्षमता कमकुवत झाली होती.”यूपीएच्या राजवटीत, वाटाघाटी सुरू व्हायच्या आणि नंतर तुटायच्या; दीर्घ वाटाघाटी करूनही फारसे खरे निष्कर्ष निघत नव्हते”, असं मोदी म्हणाले.
“विकसित भारतची पुढील झेप खाजगी क्षेत्राकडून नवोन्मेष, दीर्घकालीन क्षमता आणि जागतिक स्पर्धात्मकतेमध्ये धाडसी गुंतवणुकीवर अवलंबून असेल”, असंही त्यांनी सांगितलं.

