PM Modi Meets IAF, Navy Chief: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दोन आठवडे उलटले असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची देशांतर्गत मागणी वाढू लागली आहे. त्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना ‘पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं जाईल’, असं विधान केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाल्याचं दिसून येत आहे. एकीकडे सीमेवर दोन्ही बाजूंनी लष्करी सुसज्जता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढवली जात असताना दुसरीकडे राजधानी दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई दल प्रमुख व नौदल प्रमुखांशी सज्जतेसंदर्भात सविस्तर चर्चा केली.
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, आधी नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली. अरबी समुद्रातील नौदलाच्या तैनातीवर त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. नौदलाच्या पश्चिमेकडच्या आघाडीवरील सर्व युद्धनौका सध्या अरबी समुद्रात उतरवण्यात आल्या आहेत. भारतीय नौदल अरबी समुद्रात सर्व उपलब्ध सामग्रीसह सज्ज असून केंद्र सरकारचे आदेश आल्यास आवश्यक ती कारवाई करण्यासाठी तयार असल्याची माहिती संरक्षण दलातील सूत्रांनी दिली आहे.
हवाई दल प्रमुखांनीही घेतली भेट
दरम्यान, नौदल प्रमुखांची भेट झाल्यानंतर काही तासांत भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. आणीबाणीच्या प्रसंगी कारवाई करण्यासाठी भारतीय हवाई दलाची काय तयारी आहे? यासंदर्भात पंतप्रधानांशी त्यांची सविस्तर चर्चा झाल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या दोन उच्चस्तरीय बैठकांमुळे राजधानीतलं वातावरण बदलू लागल्याचं बोललं जात आहे.
राजनाथ सिंह यांचं विधान आणि चर्चेला उधाण
रविवारी झालेल्या या बैठकांबाबत केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचं अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. मात्र, एकीकडे या बैठकांमध्ये लष्कराच्या तयारीची सविस्तर माहिती घेण्यात आलेली असताना दुसरीकडे संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे. “देशाचा संरक्षण मंत्री म्हणून आपल्या सैन्याचं आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. आपल्या देशाकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आपल्या लष्कराच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे”, असं राजनाथ सिंह दिल्लीत म्हणाले.
“तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यवस्थित ओळखता. त्यांची काम करण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे. शिवाय आयुष्यात जोखीम पत्करण्याची त्यांनी आत्मसात केलेली क्षमताही तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला शब्द देतो, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तुम्हाला जे हवंय, ते होणारच”, असंही सिंह यांनी नमूद केलं.