पंतप्रधान मोदी यांनी चक्क एका काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक केलं आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. “राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे माझे चांगले मित्र आहेत”, असं विधान पंतप्रधानांनी केलं आहे. गुरुवारी (३० सप्टेंबर) राजस्थानमध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभरणीच्या व्हर्च्युअल समारंभात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे आभार मानत कौतुक केलं आहे.

“मुख्यमंत्री गहलोत यांनी राज्यासाठीच्या विकासकामांची यादीच माझ्यासमोर ठेवली आहे. यामधून हे स्पष्ट दिसून येतं की, वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असूनही त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. यासाठी मी अशोक गेहलोत यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री गहलोत हे माझ्याशी खुल्या मनाने बोलले. कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. ही मैत्री आणि विश्वासच हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे”, असं मोदी म्हणाले. मोदींच्या या विधानानंतर गेहलोत देखील स्मितहास्य करताना दिसले.

आत्मनिर्भर होण्याचा संकल्प!

“करोना महामारीने जगभरातील आरोग्य क्षेत्राबद्दल बरंच काही शिकवलं आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक देश आपापल्यापरिने या संकटाला समोरं जात आहे. दरम्यान, भारताने या काळात आपली शक्ती वाढवण्याचा आणि आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. राजस्थानमध्ये चार नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचं बांधकाम सुरू होणं आणि जयपूरमध्ये पेट्रोकेमिकल्स संस्थेचं उद्घाटन होणं ही याच दिशेने उचललेली महत्त्वाची पावलं आहेत”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

“केंद्र सरकारने २०१४ पासून राजस्थानमध्ये २३ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. त्यापैकी ७ महाविद्यालयांचं काम सुरु झालं आहे”, असंही नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं आहे.