संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतही काँग्रेसला पुन्हा एकदा लक्ष्य केलं. गोव्यात विधानसभा निवडणुकांसाठी सध्या जोरदार तयारी सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे आणत काँग्रेसवर आणि माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या धोरणांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी ह्रदयनाथ मंगेशकर यांना सावकरांची कविता सादर करण्यात आल्याने नोकरीवरुन काढून टाकलं होतं सांगत स्वांतंत्र्याच्या या खोट्या गोष्टी तुम्ही देशासमोर ठेवल्या आहेत अशी टीका केली. "लता मंगेशकरांच्या निधनानं देश दुःखी झाला आहे. लता मंगेशकर यांचं कुटुंब हे गोव्यातील आहे. पण त्यांच्या कुटुंबासोबत कशाप्रकारे अन्याय केला हेदेखील देशाला समजलं पाहिजे. लता मंगेशकर यांचे छोटे भाऊ पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. हृदयनाथ मंगेशकर यांनी वीर सावकरांची देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं," असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. Goa Election : काँग्रेसमुळे गोव्याला स्वातंत्र्य उशीरा मिळाले, पंतप्रधान मोदी यांची टीका "जेव्हा ते सावरकरांना भेटले तेव्हा कवितेला चाल लावण्याबद्दल सांगितलं होतं. त्यावर सावरकरांनी हृदयनाथ यांना माझी कविता सादर करुन जेलमध्ये जायचंय का? अशी विचारणा केली होती. यानंतर हृदयनाथ यांनी त्यांच्या देशभक्तीपर कवितेला संगीतबद्ध केलं होतं. त्यानंतर आठ दिवसांच्या आत हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं. हे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वांतंत्र्याच्या या खोट्या गोष्टी तुम्ही देशासमोर ठेवल्या आहेत," अशी टीका नरेंद्र मोदींनी यावेळी केली. “भारत स्वतंत्र झाल्यानंतर १५ वर्षांनी गोवा मुक्त झाला. सरदार वल्लभाई पटेल यांनी हैद्राबाद, जुनागढसाठी रणनिती बनवली, पावले उचचलली, तशी प्रेरणा घेत गोव्यासाठी रणनिती बनवली असती तर गोव्याला १५ वर्षे गुलामीत रहावं लागलं नसतं” अशी टीका त्यांनी काँग्रेसवर आणि तत्कालीन धोरणांवर केली. गोवामुक्तीच्या विषयावरुन त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यावर थेट टीका मोदी यांनी केली. तेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये नेहरुंवर काय टीका केली जात होती याबद्दलचे मुद्दे सभागृहात भाषणामध्ये मोदी यांनी सांगितले. तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा कशी असेल याची चिंता नेहरु यांना होती, तिथल्या लोकांवर गोळ्या चालवल्या जात होत्या तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की आम्ही सैन्य पाठवणार नाही. सत्याग्रहींची मदत करण्यास नकार दिला होता. गोव्याबाबत काँग्रेसने केलेला हा अन्याय आहे, यामुळे गोव्याला १५ वर्ष अधिक पारतंत्र्यात रहावं लागलं असे मोदी म्हणाले.