बिलासपूर (हिमाचल प्रदेश ) : हिमाचल प्रदेशमधील आधीच्या सरकारांनी केवळ प्रकल्पांची पायाभरणी केली, मात्र निवडणुका संपल्यानंतर या प्रकल्पांचा त्यांना विसर पडला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बिलासपूर येथे सांगितले. बिलासपूर येथे एम्स रुग्णालय आणि हायड्रो अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी पंतप्रधानांना रणसिंगा हे वाद्य दिले. हे वाद्य वाजविल्यानंतर मोदी म्हणाले, ही भविष्यातील प्रत्येक विजयाची सुरुवात आहे. भाजपचे सरकार केवळ प्रकल्पांची पायाभरणी करत नाही, तर विकास प्रकल्पांची उद्घाटनही करते, असे मोदी या वेळी म्हणाले. जानेवारी महिन्यात हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होत असून या निवडणुकीत भाजप विजयी होऊन पुन्हा सत्तेत येईल, असे मोदी म्हणाले.