नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यादरम्यान सोमवारी आभासी शिखर परिषद होण्याच्या आधी ऑस्ट्रेलियाकडून भारताला भारतातील २९ पुरातन वस्तू परत करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वस्तूंची पाहणी करून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे आभार मानले. मॉरिसन आणि मोदी यांच्यातील आभासी शिखर बैठक सोमवारी पार पडली. तत्पूर्वी भारताचा हा पुरातन ठेवा ऑस्ट्रेलियाकडून परत करण्यात आला. ऑस्ट्रेलियाकडून परत मिळालेल्या या वस्तू प्रामुख्याने सहा कलात्मक संकल्पनांवर आधारित आहेत. यात शिव आणि त्याचे गण, शक्तिउपासना, विष्णुअवतार, जैन परंपरा यांच्यासह काही चित्रे आणि २८ कलात्मक वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू नवव्या आणि दहाव्या शतकातील वेगवेगळय़ा काळांतील आहेत. या वस्तूंच्या निर्मितीत वालुकामय दगड, संगमरवर, कासे, पितळ आणि कागदाचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या वस्तू मूळच्या राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, तेलंगण आणि पश्चिम बंगाल भागातील आहेत. भारतातील प्राचीन भारतीय कलात्मक वस्तू भारताला परत देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पुढाकार घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार. यात काही शतकांपूर्वीच्या मूर्ती, चित्रे यांचा समावेश आहे. या वस्तू मूळ स्थानावरून बेकायदा काढून नेण्यात आल्या होत्या. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान