जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी म्हणजेच ११ जुलै २०२१ रोजी उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-२०३०  धोरणाची घोषणा केली. वाढती लोकसंख्या हाच विकासाच्या प्रक्रियेतील खरा अडथळा आहे, लोकसंख्या नियंत्रणासाठी जास्तीत जास्त प्रयत्नांची गरज आहे, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे धोरण जाहीर करताना व्यक्त केलं. यावरुन विरोधक आणि सत्ताधारी असा वाद सुरु अशतानाच आता लोकप्रिय शायर मुनव्वर राणा यांनी या धोरणावर योगी सरकारवर टीका केलीय. दोन मुलांच्या जन्माचं धोरण आखणाऱ्या सरकारला मुस्लीम आठ मुलं जन्माला का घालतात हे मला सांगायचंय म्हणत राणा यांनी योगी सरकारच्या धोरणावर निशाणा साधलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> “ओवैसींच्या मदतीने योगी पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेश सोडून निघून जाईन”

लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातील टू चाइल्ट पॉलिसीसंदर्भात मुन्नवर राणा यांना आपलं मत न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलं आहे. “लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या गोष्टी करणाऱ्या सरकारला मला हे सांगायचं आहे की मुस्लीम आठ मुलं यासाठी जन्माला घालतात कारण त्यांना भीती असते की त्यांची दोन मुलं दहशतवादी म्हणून मारली जाऊ शकतात, दोघं करोनाने मरु शकतात मग अशावेळी आई-बापाची पार्थिव स्मशानभूमीपर्यंत पोहचवायला कोणीतरी हवं ना?”, असा खोचक टोला राणा यांनी मुलाखतीदरम्यान लगावलाय.

नक्की वाचा >> चार मुलांचा बाप असणारा भाजपा खासदार मांडणार ‘लोकसंख्या नियंत्रण विधेयक’

“उत्तर प्रदेश मुस्लिमांना राहण्यासाठी योग्य ठिकाण नाही”

उत्तर प्रदेशमधील मुस्लिमांच्या परिस्थितीसंदर्भात पुढे बोलताना आता उत्तर प्रदेश मुस्लिमांना राहण्यासाठी योग्य ठिकाण नाहीय असं मी मानतो, असंही राणा म्हणालेत. भाजपा आणि ओवैसी हे असे दोन कुस्पीपटू आहेत जे केवळ लोकांना दाखवण्यासाठी एकमेकांविरोधात लढत आहेत. मतांचं ध्रुवीकरण व्हावं आणि त्याचा फायदा भाजपाला व्हावा असं या दोघांचा डाव असल्याचा दावा राणा यांनी केलाय. उत्तर प्रदेशमधील मुस्लिमांना थोडी सुद्धा अक्कल असेल तर त्यांनी ओवैसींच्या पक्षाला मतदान करु नये, असं राणा म्हणालेत. राणा यांनी मागील काही दिवसांमध्ये दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईनंतर अटक करण्यात आलेल्या अलकायदाच्या दोन दहशतवाद्यांच्या अटकेवरुनही शंका उपस्थित केलीय.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरणाला फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले “गरज पडल्यास…”

…तर मला पण पकडतील

ज्या दोन मुलांना दहशतवादी म्हणून अटक करण्यात आलीय ते दोघे इतके गरीब आहेत की त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. त्यांना अलकायदाशी संबंधित असल्याचा ठपका ठेवत ताब्यात घेण्यात आलं आहे आणि प्रेशर कुकरला बॉम्ब असं सांगण्यात येत आहे. मी सुद्धा यापूर्वी कार्यक्रमासाठी पाकिस्तानला जायचो. काही दिवसांपूर्वी मी प्रेशर कुकर खरेदी केला आहे. आता दहशतवादी विरोधी पथक मला सुद्धा दहशतवादी आणि तालिबानी समजून उचलून तर घेऊन जाणार नाही ना?, अशी भीती वाटू लागलीय, असा टोलाही त्यांनी मुलाखतीमध्ये लगावला.

ओवैसींचाही योगींवर हल्ला बोल…

काही दिवसांपूर्वीच ओवैसी यांनी उत्तर प्रदेशमध्ये लागू करण्यात आलेल्या  उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-२०३०  टीका केली होती. “डिसेंबर २०२०मध्ये केंद्रातील मोदी सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं की जन्मदर (Total Fertility Rate) घटू लागल्यामुळे देशात दोन अपत्य धोरण राबवता येणार नाही. पण दुसरीकडे आता योगी सरकार मात्र त्यालाच विरोध करत आहे. हा प्रस्ताव मांडून योगी सरकार मोदी सरकारच्या विरोधात जाणार का?”, असा प्रश्न ओवैसींनी उपस्थित केला होता.  प्रस्तावित विधेयक घटनाविरोधी असल्याचंही यावेळी म्हटलं. “योगी सरकारने मांडलेलं लोकसंख्या नियंत्रण विधेयक हे राज्यघटनेच्या कलम २१ चं उल्लंघन ठरेल. शिवाय, हे विधेयक महिलांसाठी त्रासदायक ठरेल. कारण भारतात गर्भधारणा टाळण्यासाठी ९३ टक्के महिलांचे ऑपरेशन होतात. गर्भधारणा व्हावी की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार महिलांनाच दिला गेला पाहिजे”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poet munawwar rana slams yogi adityanath government over uttar pradesh population policy 2021 2030 scsg
First published on: 17-07-2021 at 18:27 IST