तामिळनाडूमधील कुन्नूर येथे झालेल्या भीषण अपघातात भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १४ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेने देशासह जगाला हादरवलं. त्यानंतर हा अपघात कसा झाला, या सर्वांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यावर अनेक तर्कवितर्क देखील लावले गेले. मात्र, आता या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. यात या अपघातामागील नेमक्या कारणांचा उलगडा झाला आहे.

चौकशी अहवालात काय खुलासा?

८ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या अपघातावरील प्राथमिक अहवाल न्यायालयात (The Tri-Services Court) सादर करण्यात आला आहे. या चौकशीत तपास पथकाने हेलिकॉप्टरचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरचाही अभ्यास केला. याशिवाय सर्व साक्षीदारांचे जबाबही घेण्यात आले. यातून या अपघाचे कारण काय असू शकते याचा अंदाज घेण्यात आला. चौकशीत अपघातामागे मेकॅनिकल फेल्युअर म्हणजेच यांत्रिक बिघाड, घातपात किंवा दुर्लक्ष अशी कारणं नसल्याचं म्हणत त्या शक्यता फेटाळल्या आहेत.

“अपघाताला अचानक बदललेलं हवामान आणि हेलिकॉप्टर ढगांमध्ये जाणं जबाबदार”

या अहवालात हेलिकॉप्टरच्या अपघाताला अचानक बदललेलं हवामान आणि त्यानंतर हेलिकॉप्टरचा ढगांमध्ये प्रवेश हे कारण असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. कोर्ट ऑफ इंक्वायरीने चौकशी अहवालातील माहितीच्या आधारे काही शिफारसी देखील केल्या आहेत.

हेही वाचा : “हेलिकॉप्टर झाडांना धडकलं, स्फोट झाला; काहींनी उड्या मारल्या, पण…”; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगळाळ प्रदेशामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते. यात लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता.

तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. मात्र, या अपघातात रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला होता. यात रावत यांच्या पत्नीचाही समावेश होता. अपघातात एक अधिकारी वाचले. मात्र, ते गंभीर जखमी असल्यानं नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशाप्रकारे या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व १४ जणांचा मृत्यू झाला होता.