पीटीआय, राजगीर (बिहार)
देशातील उच्च शिक्षण प्रणाली अधिक प्रगत आणि संशोधनाभिमुख करण्याच्या दिशेने केंद्र सरकार काम करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाच्या नव्या परिसराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी नेहमी जिज्ञासू आणि निर्भय राहण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
भारत हे ज्ञान आणि शिक्षणाचे जागतिक केंद्र बनू इच्छित आहे. गेल्या १० वर्षांत देशात दर आठवड्याला सरासरी एक विद्यापीठ तयार झाले आहे, असे मोदी यांनी सांगितले. शिक्षणात भक्कम प्रगती केल्यानंतरच विकसित राष्ट्रांनी आर्थिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात भरारी घेतल्याचा इतिहास आहे. २१ जूनला होत असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी भारत जागतिक स्तरावर सांस्कृतिक देवाणघेवाण करत असल्याचे नमूद केले. दहा वर्षांपूर्वी देशात केवळ शंभर नवउद्यामी होते. आजही ही संख्या एक लाख तीस हजार आहे. संशोधनासाठी विक्रमी संख्येने तरुण पुढे येत असून, सरकारने त्यासाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. कौशल्यपूर्ण तसेच अत्याधुनिक उच्च शिक्षणाची व्यवस्था निर्माण करण्याचे आपले ध्येय असल्याचे ते म्हणाले. देशात सध्या २३ आयआयटी तर २१ आयआयएम आहेत. दहा वर्षांपूर्वी ही संख्या १३ होती. तसेच एम्सही २२ असून दहा वर्षांत वैद्याकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाल्याने पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>मोठी बातमी! यूजीसी नेट परीक्षा रद्द; पेपर फुटल्याचा संशय, शिक्षण मंत्रालयाने दिली माहिती
शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या सुधारणा होतील असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. नवे शैक्षणिक धोरण युवा पिढीच्या स्वप्नांना गवसणी घालणारे असेल. आमची विद्यापीठे परदेशी विद्यापीठांशी सहकार्य करतील. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शिक्षण संस्था या भारतात आपली केंद्रे सुरू करत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भारत हे ज्ञान व शिक्षणाचे केंद्र होईल असा आत्मविश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
‘नालंदा महाविहारा’ला भेट
या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी नालंदा महाविहाराला येथे भेट दिली. सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर दहा दिवसांमध्येच येथे भेट देण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. प्राचीन नालंदा विद्यापीठ हे पाचव्या शतकापासून अस्तित्वात असून, जगभरातील विद्यार्थी येथे अध्ययनाला येत असत. ८०० वर्षे त्याची भरभराट झाल्यानंतर १२ व्या शतकात आक्रमकांनी उद्ध्वस्त केल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
नालंदा हे भारताच्या शैक्षणिक वारशाचे आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रतीक आहे. हे केवळ भारताच्या भूतकाळाचे पुनर्जागरण नाही, तर अनेक देशांचा वारसा नालंदाशी जोडला गेला आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान