पीटीआय, देहरादून जोशीमठची जमीन खचून घरांना तडे जात असल्याने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शनिवारी या भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. धामी यांनी लोकांची भेट घेऊन त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यास सरकारने प्राधान्य दिले आहे. गुरुवारपासून तेथे तळ देऊन असलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाशीही धामी यांनी चर्चा केली. या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले जात असून या कामाची त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. जोशीमठमधील नागरी वसाहतींच्या अरुंद रस्त्यांवरून जात धामी यांनी तडे गेलेल्या घरांची आत जाऊन पाहणी केली. धोकादायक भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सरकारचे प्रथम प्राधान्य आहे, असे त्यांनी वार्ताहरांना सांगितले. भूस्खलनाचा धोका लक्षात घेता या भागासाठी दीर्घकालीन उपाययोजना, पुनर्वसन धोरण ठरविण्याबाबत विचार सुरू आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी येथील प्रसिद्ध नरसिंह मंदिरातही लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. निसर्गाविरुद्ध गेल्याचा परिणाम : राहुल गांधीनवी दिल्ली : जोशीमठमध्ये घरांना तडे गेल्याने नागरिकांवर ओढवलेल्या संकटाबाबत काँग्रेसचे नेत राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली असून सरकारने सध्याच्या थंडीच्या दिवसांत या हे लोक सुरक्षित राहतील, याची तजवीज करावी, अशी मागणी केली आहे. राहुल यांनी फेसबुकवरील संदेशात म्हटले आहे की, जोशीमठमधील दृश्ये भयावह आहेत. निसर्गाच्या विरोधात जात सातत्याने केलेले उत्खनन आणि डोंगररांगांत कोणत्याही नियोजनाशिवाय केलेली बांधकामे यामुळे हे संकट उद्भवले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. जोशीमठ हे सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्टय़ाही महत्त्वाचे स्थान आहे. हे ठिकाण वाचविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील. - पुष्कर सिंह धामी, मुख्यमंत्री, उत्तराखंड