भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीच्या निषेधार्थ राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरातसह अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळण लागले असून जीवित तसेच मोठी वित्तहानी झाली आहे. निदर्शने आणि हिंसाचाराचे हो लोण आता झारखंडपर्यंत पोहोचले आहे. येथे शुक्रवारी नुपूर शर्मा यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात येथे दोघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

हेही वाचा >> काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ED चे पुन्हा समन्स; २३ जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

याबाबतचे सविस्तर वृत्त आजतकने दिले आहे. या वृत्तानुसार झारखंडमधील रांची येथे शुक्रवारी संध्याकाळी नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीला घेऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी रस्त्यावर हजारो लोक जमले होते. निदर्शकांना पांगवण्यासाठी येथील पोलिसांनी लाठीमार तसेच गोळीबार केला. त्यानंतर वातावरण चिघळल्यामुळे निदर्शनाला हिंसक वळण मिळाले. निदर्शकांनीदेखील पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मुद्दसीर उर्फ कैफी आणि मोहम्मद साहील अशी मृतांची नावे आहेत. तर आठ जणांवर सध्या उपचार सुरु आहे.

हेही वाचा >> प्रेषित अवमानप्रकरणी निदर्शनांना हिंसक वळण ; पश्चिम बंगालमध्ये महिला ठार, उत्तर प्रदेशात १०९ निदर्शक अटकेत 

रांची शहरात नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी घेऊन हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. सध्या या जमावावर नियंत्रण मिळवण्यात आले असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. सध्या रांची या शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून येथे जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

हेही वाचा >> काँग्रेसचे तीनही उमेदवार विजयी, भाजपचा डाव फसला!; राजस्थानमध्ये ‘गेहलोतनीती’ यशस्वी

दरम्यान, निदर्शने आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. झारखंडची जनता सहनशील असून घाबरण्याची गरज नाही, असे सोरेन म्हणाले आहेत.