लोकसभेत खासदारांचं संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपाशासित केंद्र सरकारने प्रस्ताव ठेवल्याचा दावा काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केला आहे. २०२४ च्या आधी लोकसभेचं संख्याबळ वाढवत १००० किंवा त्यापेक्षा जास्त असावं असा उल्लेख या प्रस्तावामध्ये केंद्र सरकारने केल्याचं मनिष तिवारी यांनी म्हटलं आहे. मात्र असा कोणताही निर्णय घेण्याआधी लोकांचं मत जाणून घेणं गरजेचं असल्याचं मनिष तिवारी यांनी सांगितलं आहे. मनिष तिवारी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "संसदेतील माझ्या काही विश्वासार्ह सहकाऱ्यांनी लोकसभेचं संख्याबळ १००० किंवा त्याहून जास्त वाढवण्याचा भाजपाचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली आहे. नवीन संसदेचं चेंबर १००० जण बसू शकतील अशा पद्धतीने बांधलं जात आहे. पण हे करण्याआधी लोकासोबत गंभीरपणे यावर चर्चा झाली पाहिजे". I am reliably informed by Parlimentary colleagues in @BJP4India that there is a proposal to increase strength of Lok Sabha to 1000 or more before 2024. New Parliament Chamber being constructed as a 1000 seater. Before this is done there should be a serious public consultation. — Manish Tewari (@ManishTewari) July 25, 2021 काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. "सार्वजनिक वाद-विवाद होणं आवश्यक आहे. आपल्यासारख्या मोठ्या देशात लोकांमधून निवडून येणाऱ्या जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. पण ही वाढ जर लोकसंख्येच्या आधार होत असेल तर दक्षिणेकडील राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होईल आणि हे मान्य नाही". Public debate is needed. A large country like ours needs more directly elected representatives. But if the increase is based on population it will further diminish the representation of the southern states, that will not be acceptable. — Karti P Chidambaram (@KartiPC) July 25, 2021 सध्या लोकसभेत ५४३ आणि राज्यसभेत २४५ सदस्य आहेत. संसदेची नवी इमारत उभारली जात असून सरकारने लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्याचं संकेत सरकारने दिली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी डिसेंबर २०२० मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. लोकसभा संपूर्ण देशातील नागरिकांचं प्रतिनिधित्व करत असून भविष्यात खासदारांची संख्या वाढवली जाऊ शकते असं म्हटलं होतं.