मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील ५ चित्ते आणि ३ बछड्यांचा मृत्यू झाला आहे. दोन आठवड्यापूर्वी तेजस आणि सूरज या दोन नर चित्त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चित्त्यांच्या गळ्यात असलेल्या रेडिओ कॉलरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होता. अशातच आता सहा चित्त्यांच्या गळ्यातील रेडिओ कॉलर काढून टाकण्यात आली आहे. त्यातीत दोन चित्त्यांना संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मध्य प्रदेशचे माजी मुख्य वन्यजीव अधिकारी जे. एस. चौहान यांना काही दिवसांपूर्वी हटवण्यात आलं आहे. त्यापूर्वी चित्त्यांच्या गळ्यात असलेली रेडिओ कॉलर काढून टाकण्यात यावी. कारण, यामुळे चित्त्यांना संसर्ग होत असल्याचा दावा चौहान यांनी केला होता.
त्यानंतर रविवारी पावक, आशा, धीरा, पवन, गौरव आणि शौर्य अशा सहा चित्त्यांच्या गळ्यातील रेडिओ कॉलर काढून टाकण्यात आल्याची माहिती रविवारी वन अधिकाऱ्यांनी दिली.
वनअधिकाऱ्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं की, “काही चित्त्यांना लहान जखमा झाल्या आहेत. तर, गौरव आणि शौर्य चित्त्यांना गंभीर संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रेडिओ कॉलरमुळे पुन्हा समस्या होऊ नये, तसेच कॉलरच्या डिझायनवर चर्चा करण्यात येणार आहे.”