फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या निर्णयांना भारतीय हवाई दलास दिलासा मिळणार असून येत्या दोन वर्षांत ही विमाने हवाई दलात सामील केली जातील असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले.
ही विमाने खरेदी करण्याचा भारताचा निर्णय महत्त्वाचा असून त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस ओलांद यांच्यात चर्चा झाली. या विमानांमुळे भारतीय हवाई दलांची क्षमता वाढणार आहे असे सांगून र्पीकर म्हणाले की, गेल्या १७ वर्षांत भारताने कुठलीच नवीन पद्धतीची विमाने खरेदी केली नव्हती. चांगल्या अटी व शर्तीवर ३६ विमानांची खरेदी करण्याचा करार झाला असून हा सकारात्मक निर्णय आहे.

राफेल विमाने हवाई दलात सामील करण्यास दोन वर्षे का लागतील याचे कारण पर्रिकर यांनी दिलेले नाही पण तज्ज्ञांच्या मते वाटाघाटी व विमानांच्या जोडणीत एवढा कालावधी लागण्याची शक्यता आहे.  मिग २१, मिग २७, सुखोई ३० ही लढाऊ विमाने आपल्याकडे आहेत. मिग विमाने जुनी झाली असून त्यांचे आयुष्य कमी आहे, ती कालांतराने काढावी लागतील त्यांची जागा राफेलसारखी विमाने घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारत व चीनने परस्परविश्वास निर्माण करण्यासाठी केलेल्या उपायांमुळे गेल्या वर्षभरात चीनने भारताच्या भूमीवर अतिक्रमण करण्याच्या घटना कमी झाल्या असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले आहे.
भारताचा चीनसोबतचा सीमावाद भारताच्या स्वातंत्र्यापासून आहे. ही सीमा म्हणजे काल्पनिक रेषा असून या संदर्भात आकलनाशी संबंधित काही मुद्दे आहेत, असे पर्रिकर यांनी सांगितले.
आम्ही जी भूमी आमची मानतो, तेथे त्यांचे सैन्य शिरते. पण अशा प्रकारे गल्लत होणारी क्षेत्रे कमी झाली असून गेल्या वर्षभरात ही संख्या फारच कमी आहे, असे पर्रिकर म्हणाले.