Raghav Chadha Z Plus Security: आम आदमी पक्षाने राज्यसभेच्या उपनेतेपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर आता राघव चड्ढा यांना आणखी एक मोठा धक्का देण्यात आला आहे. पंजाब सरकारने राघव चड्ढा यांची झेड प्लस (Z+) सुरक्षा काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. आजच (१५ एप्रिल) चड्ढा यांची सुरक्षा हटवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, केंद्र सरकार आता त्यांना सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

झेड प्लस सुरक्षेचे कवच हटवले

आम आदमी पक्षाचे सर्वोसर्वा अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळी अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून राघव चड्ढा यांची ओळख होती. आम आदमी पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पक्षाने त्यांना राज्यसभा उपनेतेपदावरुन हटवले. त्यानंतर आता त्यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. ३७ वर्षीय चड्ढा यांच्या सुरक्षेसाठी पंजाबमधील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या सर्वांना आता पोलिस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले.

उपनेतेपदावरुन हटवल्यानंतर दुसरा धक्का

राघव चड्ढा आणि आपमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला आहे. खासदार चड्ढा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी घाबरत असल्याचा आरोप आपने केला आहे. चड्ढा केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यास कुचराई करत असून, प्रसिद्धीच्या मागे लागल्याचा आरोपही आपने केला. दरम्यान, ०२ एप्रिल रोजी त्यांना पक्षाने राज्यसभा उपनेते पदावरुन हटवले. पक्षाने केलेल्या आरोपांना मात्र राघव चड्ढा यांनी फेटाळून लावताना आरोप खोटे असल्याचे म्हणत लोकांचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी संसदेत गेलो असल्याचे मत मांडले.

आपमध्ये चड्ढा यांच्याविरोधात नाराजी

आम आदमी पक्षाने (आप) राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा यांची पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी पंजाबचे अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातील महत्त्वाच्या घडामोडींवर राघव चड्ढा यांनी बाळगलेले मौन आणि बैठकांना सतत गैरहजर राहणे यामुळे पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज होते. राघव चड्ढा यांची २०२३ मध्ये उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती.

केंद्र सरकार पुरवणार सुरक्षा

पंजाब सरकारने राघव चड्ढा यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेतल्यानंतर आता केंद्र सरकार त्यांना सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. केंद्रातून सुरक्षेची व्यवस्था होईपर्यंत दिल्ली पोलिसांनी त्यांना सुरक्षा द्यावी, अशा सूचना देण्यात आल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने प्रसिद्ध केले आहे.