राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना आव्हान

‘सहकाऱ्यांच्या माध्यमातून चिखलफेक करण्याऐवजी पंतप्रधानांनी मला थेट तुरुंगात पाठवून दाखवावेच. सरकार तुमचे आहे, तुम्ही विरोधक नाहीत, असे असताना माझ्यावरील आरोपांची चौकशी करा आणि थेट तुरुंगातच पाठवा’, अशा आक्रमक शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे.
भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इंग्लंडमधील एका कंपनीकडील दस्तऐवजात राहुल यांनी आपण ब्रिटिश नागरिक असल्याचे नमूद केले आहे, असा आरोप स्वामी यांनी केला आहे. स्वामी यांच्या आरोपांचा समाचार घेताना राहुल यांनी गुरुवारी थेट मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच शरसंधान साधले. इंदिरा गांधी यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त युवक काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात राहुल बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग करते, असा आरोपही राहुल यांनी केला. संघ व भाजपने कायमच आपल्या कुटुंबावर चिखलफेक केली असल्याचे आपण लहानपणापासून पाहात आलो असल्याचेही राहुल यांनी सांगितले.