काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरून मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारची तुलना पुरातन लोककथांमधील भरमसाठ करवसुली करणाऱ्या सत्ताधाऱ्यांशी केलीय. तसेच सुरुवातीला जनता दुःखी असली तरी शेवटी जनता हे सरकार संपवते, असा इशारा दिलाय. यावेळी त्यांनी मोदी सरकारने गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या करातून जमा केलेले २३ लाख रुपये कुठं गेले? असा प्रश्नही उपस्थित केलाय.

राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “पुरातन लोककथांमध्ये भरमसाठ करवसुली करणाऱ्या स्वार्थी सत्ताधाऱ्यांच्या गोष्टी होत्या. अशावेळी सुरुवातीला जनता दुखी होते, मात्र नंतर शेवटी हीच जनता हे सरकार संपवते. वास्तवातही असंच होणार.” या ट्विटमध्ये त्यांनी करखंडणी (Tax Extortion) आणि इंधन दर (Fuel Prices) हे दोन हॅशटॅग देखील वापरले आहेत.

राहुल गांधींनी या ट्विटसोबत एक व्हिडीओ देखील पोस्ट केलाय. त्यात त्यांनी म्हटलं, “सरकारने २३ लाख कोटी रुपये जीडीपीतून कमावले आहेत. हा जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट नाही, तर गॅस, डिझेल, पेट्रोल आहे. हे २३ लाख कोटी रुपये गेले कुठं हा माझा प्रश्न आहे. नागरिकांच्या खिशातून जो पैसा हिसकावून घेतला जात आहे हा पैसा कुठं जातोय हा जनतेनं प्रश्न विचारायला हवा.”

हेही वाचा : “माझा मोदींबाबत हा आक्षेप आहे की…” केरळ दौऱ्यावर राहुल गांधींचं टीकास्त्र!

दरम्यान, राहुल गांधी यांनी आधीही भाजपावर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात शाब्दिक हल्ला चढवला होता. देशाच्या एकतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी घाव घालत असल्याची टीका राहुल गांधींनी केली होती.

“ते म्हणतात भारत प्रदेश आहे, आम्ही म्हणतो…”

मलप्पुरममध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले, “ते (मोदी) म्हणतात भारत हा एक प्रदेश आहे. आम्ही म्हणतो भारत म्हणजे लोक आहेत, नातेसंबंध आहेत. ही हिंदूंची मुस्लिमांसोबतची नाती आहेत. मुस्लिम आणि शिखांमधली, तामिळ-हिंदी-उर्दू-बंगालीमधली नाती आहेत. माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेप हा आहे की ते ही नाती तोडत आहेत.”

‘भारत’ या संकल्पनेवरच आघात

“जर भारतीयांमधली नाती पंतप्रधान नरेंद्र मोदी तोडत असतील, तर ते ‘भारत’ या संकल्पनेवरच आघात करत आहेत. म्हणून मी त्यांना विरोध करतोय. आणि त्याचप्रकारे, जर ते भारतीयांमधील नाती तोडत असतील, तर भारतीयांमधला दुवा पुन्हा एकदा उभा करणं हे माझं कर्तव्य आणि बांधिलकी आहे”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. “प्रत्येक वेळी दोन भारतीयांमधील नातं तोडण्यासाठी ते द्वेषाचा आधार घेतात. प्रेमाचा आधार घेऊन ती नाती पुन्हा जोडणं हे माझं काम आहे. आणि हे फक्त माझं काम नसून आपल्या सगळ्यांचं काम आहे. या देशातल्या वेगवेगळ्या संस्कृती, परंपरा, कल्पना, धर्म समजून घेतल्याशिवाय हे काम मी करू शकणार नाही”, असं देखील राहुल गांधींनी यावेळी नमूद केलं.