दिल्लीत रेल्वे प्रशासनाने अनधिकृत झोपड्या पाडल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केजरीवाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पण राहुल गांधी यांच्या टीकेला महत्त्व न देता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राहुल हे अजूनही बाल्यावस्थेत असल्याचा टोला लगावला आहे.
राहुल यांनी सोमवारी पश्चिम दिल्लीतील शकूर बस्तीतील बेघर झालेल्यांची भेट घेतली. दिल्लीची सत्ता आम आदमीकडे असूनही त्यांचे मंत्री आजही आंदोलन का करत आहेत? असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. त्यावर प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी राहुल गांधी हे अजूनही बाल्यावस्थेत असल्याचे म्हटले. रेल्वे प्रशासन हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते हे राहुल यांना त्यांच्या पक्षातील नेत्यांनी शिकवलेले दिसत नाही. ते अजूनही लहान बालकच आहेत, असा खरमरीत टोला केजरीवाल यांनी लगावला.