Rahul Gandhi काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतल्या त्यांच्या दौऱ्यात १९८४ मध्ये झालेलं ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक होती हे मान्य केलं आहे. ८० च्या दशकात ज्या चुका पक्षाकडून झाल्या आहेत त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. राहुल गांधींनी एका शीख युवकाच्या प्रश्नावर हे उत्तर दिलं. ज्यानंतर राहुल गांधींवर भाजपाने टीका केली आहे.
नेमकं काय घडलं?
दोन आठवड्यांपूर्वी राहुल गांधी यांनी अमेरिका दौरा केला. त्यावेळी ते ब्राऊन विद्यापीठातल्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावेळी तिथल्या शीख विद्यार्थ्याने ऑपरेशन ब्लू स्टारबाबत राहुल गांधींना प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी म्हणाले की काँग्रेसची ती चूक होती. तसंच काँग्रेसच्या ज्या चुका ८० च्या दशकात झाल्या त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. मी अनेकदा सुवर्ण मंदिरात गेलो आहे. शीख समुदायाबाबत माझ्या मनात आपुलकी आणि आदर आहे. मात्र ज्या घटना घडल्या त्याची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. तसंच जेव्हा ती घटना घडली तेव्हा मी राजकारणातही नव्हतो. पण हे सांगू इच्छितो की त्या घटनेची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे.
शीख तरुणाने काय प्रश्न विचारला होता?
ब्राऊन विद्यापीठात शीख विद्यार्थी म्हणाला की तु्म्ही अजूनही शिखांशी तडजोड करण्याच्या दृष्टीने काही पावलं उचललेली नाहीत. सज्जन कुमार आणि केपीएस गिल यांच्यासारख्या लोकांना राजकीय सुरक्षा देण्यात आली. मग तुम्ही ही अपेक्षा कशी करता की आम्ही भाजपाला घाबरलं पाहिजे? हा प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी हे उत्तर दिलं आणि ती काँग्रेसची चूक होती हे मान्य केलं.
भाजपाची राहुल गांधींवर टीका
दरम्यान राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी आता भारतातच नाही तर जगभरात चेष्टेचा विषय ठरले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आर. पी. सिंह म्हणाले राहुल गांधी विदेशात जातात आणि देशाच्या विरोधात तिरस्कार पसरवण्याचं काम करतात. त्यांनी भारतात देशाच्या विरोधात बोलून दाखवावं मी त्यांच्या विरोधात खटला दाखल करेन असंही त्यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
ऑपरेशन ब्लू स्टार काय होतं?
भारतीय सैन्याने पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात घुसून ऑपरेशन ब्लू स्टार फत्ते केलं होतं. स्वतंत्र खलिस्तानच्या निर्मितीसाठी पंजाबमध्ये हिंसा भडकली होती. या हिंसेला हवा देण्याचं काम ‘दमदमी टकसाल’चे जनरल सिंग भिंडरावाले यांनी केलं होतं. पंजाबमधील हिंसा, खलिस्तानी चळवळीने निर्माण केलेला उच्छाद मोडीत काढण्यासाठी तत्कालीन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचे आदेश दिले होते. पुढे त्यांच्या हत्येने देशाला त्याची किंमतही मोजावी लागली. त्यामुळे पंजाबचा इतिहास लिहिताना ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा गांधींची हत्या या गोष्टी प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात.