भारताकडे सकारात्मक विचार करणाऱयांची आणि नावीन्यपूर्ण कल्पना मांडणाऱयांची संख्या मोठी आहे. मात्र, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त पायाभूत सुविधांचा विस्तार आणि त्यातून रोजगार उपलब्ध करून दिला गेला पाहिजे, असे मत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी व्यक्त केले. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकार, रोजगार, युवावर्ग, खासगी क्षेत्राचे योगदान आदी विविध विषयांवर आपली मते मांडली. सीआयआयच्या बैठकीत पहिल्यांदाचा राहुल गांधी यांनी देशातील दिग्गज उद्योजकांपुढे आपले विचार मांडले.
देशातील प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्त ऊर्जा दडलीये. त्याच्या आशा-आकांक्षांना योग्य मार्ग दाखवून सामान्यांना सशक्त करण्याचे काम उद्योग जगताने केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून राहुल गांधी म्हणाले, पायाभूत सुविधांचा विकास करून त्यातून रोजगार निर्मिती केल्यास संपूर्ण देशाचा आणखी वेगाने विकास होण्यास पूरक परिस्थिती निर्माण होईल. खासगी क्षेत्राने देशाच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. १९९१ मध्ये ज्यावेळी मी बाहेरील विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी गेलो होतो. त्यावेळी भारत कोणालाच नीटसा माहिती नव्हता. पण, आता तशी स्थिती राहिलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सामन्यांच्या आकांक्षापूर्तीसाठी खासगी क्षेत्राने पुढे आले पाहिजे. विविध सुविधा निर्माण करण्यासाठी खासगी क्षेत्राने पुढे आले पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर अवलंबून राहणे उपयुक्त ठरणार नाही. त्यामध्ये आपल्याला केवळ वाट बघत बसावी लागेल. एकटा माणूस देशातील अब्जावधी लोकांची आकांक्षापूर्ती करू शकणार नाही. मॉंटेकसिंह अहलुवालिया, सॅम पित्रोदा किंवा मीसुद्धा हे करू शकणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.