देशात सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकार व प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणीन लॉकडाउनसह निर्बंध अधिक कडक करण्यात आलेले आहेत. परंतु तरीही दिवसेंदिवस वाढत्या रूग्णसंख्येमुळे आता रूग्णलायांमधील बेड्स देखील अपुरे पडत आहे. परिणामी रूग्णांचे हाल असल्याने, सरकारी यंत्रणांकडून शक्य त्या अन्य उपयांचा देखील विचार केला जात आहे. दरम्यान, करोना विरूद्धच्या या लढ्यात आता रेल्वे विभागानेही पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. वाढत्या रूग्ण संख्येमुळे ज्या राज्यांकडे आयसोलेशन बेड्स उपलब्ध नसतील त्यांच्यासाठी आता रेल्वे विभागाने आयसोलेशन कोच उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.

पश्चिम रेल्वेकडे ३८६ आयसोलेशन कोच उपलब्ध असून, त्यापैकी १२८ कोच हे मुंबई विभागात आहेत. एखाद्या राज्याने या आयसोलेशन कोचची मागणी नोंदवल्यास, हे कोच त्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यास तयार असतील. अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओकडून देण्यात आली आहे.

या प्रत्येक कोचमध्ये आवश्यक असलेल्या सर्व वैद्यकीय सुविधा असून, जवळपास २४ रूग्णांची एका कोचमध्ये सोय होऊ शकते. या सर्व कोचमध्ये मिळून एकाच वेळी ३ हजार ६०० रूग्णांची व्यवस्था केली जाऊ शकते.

दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत घेतलेल्या बैठकीत देखील, नंदुरबार येथे रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली होती.