राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेस आमदारांनी केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटाबाबत सोनिया गांधींची माफी मागितल्याचे गेहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार की नाही, याबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी घेतील, असे गेहलोत यांनी म्हटले आहे.

शशी थरुर यांनी मजरुह सुलतानपुरींचा शेर केला ट्वीट, लोक म्हणाले “त्यांना तर नेहरुंनी सरकारविरोधी लिखाण केल्याने…”

“मी काँग्रेसमध्ये एका प्रामाणिक सैनिकाप्रमाणे काम करत आहे. पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवून आजपर्यंत अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. काँग्रेस पक्षाचा एका ओळीचा प्रस्ताव मी पारित करू शकलो नाही, याचे दु:ख मला आयुष्यभर असेल. राजस्थानमध्ये घडलेल्या प्रकाराची मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेत मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे”, असे गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांच्या नावाला काँग्रेस नेतृत्वाची सर्वाधिक पसंती होती. मात्र, आता या शर्यतीतून गेहलोत यांनी माघार घेतली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी दिग्विजय सिंह विरुद्ध शशी थरुर आमनेसामने येणार आहेत.

Congress President Election : अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता दिग्विजय सिंह; उद्या उमेदवारी दाखल करणार!

काँग्रेसच्या अधिसूचनेनुसार, निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज छाननीची तारीख १ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. उमेदवारांची अंतिम यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. बिनविरोध निवडणूक न झाल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे