राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळ फेरबदल आणि राजकीय नियुक्त्यांबाबत बैठकी दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पायलट यांच्या या बैठकीनंतर लवकरच गेहलोत मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. या फेरबदलात प्रादेशिक आणि जातीय समतोल निर्माण करण्यासोबतच पायलट समर्थकांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. सोनिय गांधी यांच्या भेटीनंतर भाजपाच्या राजवटीत ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाच वर्षे आंदोलन केले, उपोषण केले, काठ्या खाल्ल्या आणि तुरुंगात गेले या सर्वांना योग्य ओळख आणि सन्मान देऊन पुढे काम केले तर चांगले परिणाम मिळू शकतात, असे मला वाटते असे सचिन पायलट म्हणाले.

सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर सचिन पायलट उत्साहित दिसत होते. त्यांच्या देहबोलीवरून ते हायकमांडपर्यंत त्यांचा निरोप देण्यात यशस्वी झाल्यासारखे वाटत होते. यामुळेच त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीसोबतच आगामी तयारीचा उल्लेख केला. मला आशा आहे की एआयसीसी आणि राजस्थान सरकार योग्य संवाद साधून लवकरच योग्य निर्णय घेतील असे पायलट म्हणाले. पक्षाध्यक्षांनी वर्षभरापूर्वी स्थापन केलेल्या समितीचे काम पूर्ण झाल्याचे पायलट यांनी सांगितले.

पायलट यांच्या आधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती, त्यानंतर ते जयपूरला परतले होते. त्यानंतर सचिन पायलट गुरुवारी रात्री दिल्लीला पोहोचले. त्यांनी शुक्रवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली. “भाजपाच्या राजवटीत ५ वर्षे ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणे, पदयात्रा, उपोषणे केली, काठ्या खाल्या, तुरुंगात जाऊन आपले व्यक्तिमत्त्व खराब केले. या सर्वांना योग्य ओळख आणि सन्मान देऊन पुढे काम केले तर चांगले परिणाम मिळू शकतात, असे मला वाटते,” असे सचिन पायलट म्हणाले.

पायलट म्हणाले की, त्यांनी वर्षभरापूर्वी जे काही मांडले होते त्यावर हायकमांड काम करत असून लवकरच निर्णय घेतला जाईल. फेरबदलाच्या विलंबाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, विलंब नक्कीच झाला आहे, मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रदेश प्रभारी निर्णय घेतील. निवडणुकीला २२ महिने शिल्लक आहेत, निवडणूक जोरदार लढायची असून दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा मोडून काढायची आहे, असे ते म्हणाले.

राजस्थानमध्ये काँग्रेस एक व्यक्ती एक पदाचा फॉर्म्युला लागू करू शकतो. त्यामुळे गेहलोत सरकारमधील रघु शर्मा, हरीश चौधरी आणि दोतसरा या तीन मंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. कारण, तिन्ही मंत्री संघटनेत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. या राजीनाम्यांमुळे मंत्रिमंडळातील १२ जागा रिक्त होणार आहेत. अशा स्थितीत पायलट यांना गेहलोत मंत्रिमंडळात सुमारे अर्धा डझन समर्थक मिळू शकतात.