नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यावर आधारित बनवण्यात आलेल्या चित्ररथाचा समावेश न केल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर भेदभाव केल्याचा आरोप केला होता. मात्र आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या आरोपाचं खंडन केलं आहे. राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी यांना एक पत्र पाठवत स्पष्टीकरण दिलं आहे. राजनाथ सिंह यांनी चित्ररथाचा परेडमध्ये समावेश करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचं म्हटलं आहे. या वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने बंगाल सरकारने नेताजींच्या आयुष्यावर आधारित चित्ररथ बनवला होता. मात्र केंद्र सरकारने सांगितलं की या वर्षीच्या परेडमध्ये पश्चिम बंगालचा चित्ररथ सहभागी होणार नाही. त्यावरून ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहित या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. या मागणीला आणि ममता बॅनर्जी यांच्या आरोपांना उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, मी तुम्हाला विश्वासाने सांगत आहे की प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या चित्ररथांची निवड करण्याची प्रक्रिया पारदर्शक आहे. कला, संस्कृती, संगीत आणि नृत्य या विषयांमधले प्रख्यात विद्वानांच्या समितीकडून राज्यांनी पाठवलेल्या प्रस्तावाचं मूल्यांकन होतं. त्यानंतर ही निवड होते. या प्रक्रियेअंतर्गतच पश्चिम बंगाल राज्याचा चित्ररथ २०१६, २०१७, २०१९ आणि २०२१ या चारही वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाला होता. राजनाथ सिंह आपल्या पत्रात पुढे म्हणतात, मी तुमच्या भावनांचा आदर करतो आणि त्यामुळे मी वैयक्तिकरित्या आपणाला माहिती देऊ इच्छितो की यंदा २९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रस्तावांपैकी १२ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. आमच्याच सरकारने १९४३ मध्ये नेताजींच्या नेतृत्वाखाली बनलेल्या भारत सरकारच्या ७५ वर्षपूर्तीचा सोहळा २०१८ साली मोठ्या उत्साहात साजरा केला होता आणि प्रजासत्ताक दिवसाच्या परेडमध्ये आझाद हिंद सेनेच्या हयात असलेल्या सैनिकांचा सन्मानही केला होता. राजनाथ सिंह आपल्या पत्रात म्हणतात, मी अजून एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो की या वर्षी CPW च्या चित्ररथाच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना १२५ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. देश यंदा त्यांच्या जयंतीला प्राधान्य देत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा प्रजासत्ताक दिन सर्वच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी खूप विशेष दिवस आहे. मला आशा आहे की आपल्या सर्व शंकांचं निरसन झालं असेल. या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी आपलं सहकार्य महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक असेल.