सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (२१ ऑक्टोबर) दिल्लीच्या सीमेवर ११ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र रस्ते अडवण्याचा नाही, असं मत व्यक्त केलं. यावर शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी उत्तर दिलंय. रस्ते आंदोलक शेतकऱ्यांनी नाही, तर पोलिसांनी अडवले आहेत, असं स्पष्ट केलं.

राकेश टिकैत ‘द क्विंट’शी बोलताना म्हणाले, “दिल्लीच्या सीमेवरील रस्ते आंदोलक शेतकऱ्यांनी नाही, तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अडवले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं अगदी बरोबर म्हटलं आहे. आम्ही तर नागरिकांना प्रवास करता यावा म्हणून रस्ते सुरू ठेवले आहेत. मात्र, मोदी सरकारने हे रस्ते अडवले आहेत.”

“सर्व गोष्टी सांगण्यासाठी नसतात”

शेतकरी नेते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्या निलंबनावर प्रश्न विचारला असता राकेश टिकैत यांनी ते एका महिन्याच्या सुट्टीवर असल्याचं उत्तर दिलं. तसेच बऱ्याच गोष्टी सांगण्यासाठी असतात, पण सर्व गोष्टी सांगण्यासाठी नसतात, असंही नमूद केलं. जो निर्णय झाला तो सर्वांच्या सहमतीनं झाला, असंही त्यांनी नमूद केलं.

“गाझिपूर सीमा रिकामी केली जात असल्याच्या अफवा”

गुरुवारी संयुक्त किसान मोर्चानं यूपी गेटवर उड्डाण पुलाच्या खालील सर्व्हिस रोडवरील टेंट काढून टाकले. यानंतर सीमा रिकामी केल्याचीही चर्चा रंगली. मात्र, संयुक्त किसान मोर्चानं या अफवा असल्याचं सांगितलं. गाझिपूर सीमा रिकामी केली जात असल्याच्या अफवा आहे. त्यांना कोणताही आधार नाही. आपण केवळ हेच दाखवत आहोत की रस्ते शेतकऱ्यांनी नाही, तर पोलिसांनी अडवले आहेत.