गेल्या ११ महिन्यांपासून दिल्ली सीमेवर शेतकरी संघटना कृषीविषयक कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. याबाबत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सरकार हट्टी असेल तर, शेतकरी देखील आपल्या मागण्यांपासून मागे हटणार नाही, असे म्हटले आहे. आम्ही शेतकरी सरकारच्या चर्चेची वाट पाहत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“सरकारनं आमच्याशी बोलावं जेणेकरून आम्ही घरी परत जाऊ शकू,” असंही ते म्हणाले. दरम्यान, राकेश टिकैत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केंद्रावर जोरदार निशाणा साधला. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारतावर विजय मिळवल्यानंतर देशातील काही भागात फटाके फोडण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. यावर विचारले असता टिकैत यांनी भाजपावर निशाणा साधत, फटाके फोडणारे हेच लोक असल्याचं म्हटलंय.

राकेश टिकैत केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हणाले, “हे लोक अतिशय फसवे आणि खोटारडे आहेत. त्यांना फक्त मतं हवी आहेत. भिकारी आणि व्यापाऱ्यांना देशावर प्रेम नसतं. ते एका चौकातून दुसऱ्या चौकात भीक मागत फिरतात. व्यापारी देखील तसेच आहेत, जिथे त्यांना नफा मिळतो, तिथे ते व्यवसाय करतात. त्यांच्या मनात देशाबद्दल प्रेम नाही. या लोकांपासून दूर राहा, असे म्हातारे लोक सांगून गेले आहेत,” असंही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांनी रस्त्यावरून तंबू हटवले होते. याबाबत राकेश टिकैत म्हणाले की, दिवाळी येत आहे, त्यामुळे तंबूचे पडदे बदलावे लागतील. दरम्यान, पोलिसांचे बॅरिकेडिंग दिसावे म्हणून आम्ही तंबू हटवले. आम्ही रस्ता अडवला नाही हे लोकांना दाखवायचे आहे, असं त्यांनी सांगितलं.