आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा नकारात्मक पद्धतीने गाजावाजा करण्याचे कारण नाही, भारत म्हणजे परदेशी लोकांनी घुसखोरी करून राहण्यासाठीची धर्मशाळा नाही, असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी येथे केले. आसाममधील नागरिक नोंदणीत ४० लाख नागरिक बेकायदा ठरले असून त्या पाश्र्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले,की याचा एवढा गाजावाजा करण्याचे कारण नाही. आपला देश काही परदेशी लोकांनी घुसखोरी करून राहण्यासाठीची धर्मशाळा नाही. कुणीही येते, राहावे असे चालले आहे. घुसखोरांना हाकललेच पाहिजे त्यामुळे घुसखोरांचा शोध घेण्यासाठी आसाममध्ये नागरिक नोंदणी करण्यात आली. आसाममध्ये युवकांनी गेली आठ वर्षे घुसखोरांचा शोध घेण्यासाठी निदर्शने चालवली आहेत. त्यामुळेच ही नागरिक नोंदणी घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने एक समिती यासाठी नेमली होती. ती काँग्रेसच्या राजवटीतच नेमण्यात आली होती पण आता सगळ्या बाबी उलटसुलट करून सांगितल्या जात आहेत. एकूण ४० लाख लोक नोंदणीत अवैध ठरले आहेत. त्यांनी त्यांचे राष्ट्रीयत्व सिद्ध करावे किंवा जिथून आले तेथे माघारी जावे.