‘इंडियन एक्स्प्रेस’चे राष्ट्रीय राजकीय संपादक आणि राष्ट्रीय ब्युरोचे प्रमुख रवीश तिवारी यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. रवीश तिवारी यांच्यावर जून २०२० पासून कर्करोगाचे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. राजकीय आणि सामाजिक बदलांचा तात्काळ, अचूक वेध घेत त्याचे परखड विश्लेषण करण्याबाबत त्यांची ख्याती होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील वरिष्ठ पत्रकारांच्या चमूचे नेतृत्व तिवारी यांनी केले. यात केंद्र सरकार, राज्य आणि राष्ट्रीय निवडणुका, पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र धोरण, पायाभूत सुविधा आदी विषयांवरील बातमीदारी त्यांनी केली. बातमीदार आणि संपादक या नात्याने त्यांनी देशभर भ्रमंती केली. या दरम्यान त्यांनी ग्रामीण प्रश्न, शेती, राजकारण यावर लिखाण केले. सध्या ते उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या वार्ताकन मोहिमेचे नेतृत्व करीत होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते जयराम रमेश, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल आदी मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. एक्स्प्रेस समूहाचे चेअरमन विवेक गोएंका म्हणाले की, रवीश हे पत्रकारितेतील एक आगळे व्यक्तिमत्त्व होते. ते सर्व घटकांची बाजू ऐकून घेत. कारण देशाची राजकीय नस जाणून घेण्याचा आणि ती समजून सांगण्याचा हा उत्तम मार्ग आहे, हे त्यांना माहीत होते. त्यांच्या निधनाचे आम्हाला तीव्र दु:ख आहे. रवीश तिवारी यांनी शासकीय जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर आयआयटी- मुंबईतून बी.टेक. पूर्ण केले होते. २००५-०६ मध्ये -होड्स शिष्यवृत्ती मिळवून ते ऑक्सफर्ड विद्यापीठात ‘सामाजिक न्याय’ या विषयाचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. आयआयटी-मुंबईतील टेकफेस्ट या वार्षिकोत्सवाची संकल्पना मूर्तरूपात आणणाऱ्यांतही त्यांचा समावेश होता. ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये १२ वर्षे सेवा केलेल्या तिवारी यांनी तत्पूर्वी ‘इंडिया टुडे’ आणि ‘दी इकॉनॉमिक टाइम्स’मध्येही काम केले होते.