ज्ञानवापी प्रकरण श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, तसंच दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही असंही स्पष्ट मत मांडलं आहे. याबाबत पुण्यात बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोहन भागवत यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे असे म्हटले आहे. तसेच मुस्लिम देखील आपले बांधव आहेत आणि त्यांचा भावनांचा विचार करणे गरजेचे आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

“मोहन भागवत यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. राम जन्मभूमीच्या प्रश्नसाठी अनेक वर्ष लढा सुरू होता. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून यश मिळाले आहे. सध्या राम जन्मभूमीवर चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. प्रत्येक मशिदीमध्ये पिंड अशा पद्धतीचा इतिहास खरा आहे. एक वेळ अशी होती की, आपला सगळा देश बुद्धिस्ट होता. त्यानंतर हिंदू झाला. त्यानंतर मुघल आले आणि हिंदू लोक मुस्लिम झाले. त्यामुळे काही ठिकाणी मंदिर होती त्या ठिकाणी मशिदी आल्या आहेत ही गोष्ट खरी आहे. पण आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करायचा असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये वाद निर्माण करणे योग्य नाही. मोहन भागवत यांनी जी भूमिका मांडली ती योग्य असून प्रत्येकाने इतिहास उकरून काढण्याची गरज नाही. मुस्लिम देखील आपले बांधव आहेत आणि त्यांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे,” असे रामदास आठवले म्हणाले.

ज्ञानवापी प्रकरणात सरसंघचालक मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “प्रत्येक मशिदीत शिवलिंग…”

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी बिनविरोध निवडणूक होण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याबाबतही रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. याबाबत बोलताना त्या बद्दल मला काही माहिती नाही. यावर काय निर्णय घ्यायचा ते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील घेतील, असे रामदास आठवले म्हणाले.

राष्ट्रीय काँग्रेसला मागील २४ वर्षापासून निवडणूक प्रक्रियेतून निवडला गेला नाही. त्यामुळे आता निवडणूक प्रक्रियेतून निवडला जावा अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावर बोलताना, काँग्रेस पक्षाला निवडून आलेला अध्यक्ष हवा आहे. सोनिया गांधी या नेत्या आहेतच. पण घटनेप्रमाणे अध्यक्ष निवडावा आणि जो काही निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे, असे रामदास आठवले म्हणाले.