एससीओ शिखर बैठकीत धोरणासाठी आवाहन शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेने मूलतत्त्ववाद तसेच दहशतवादाच्या विरोधात धोरण ठरवावे व या दोन्ही आव्हानांचा प्रभावीपणे मुकाबला करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले आहे. या संस्थेच्या शिखर बैठकीत आभासी पद्धतीने केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की, या भागातील प्रश्नांचे मूळ कारण मूलतत्त्ववाद व दहशतवाद हे आहे, अफगाणिस्तानातील घडामोडीतून हेच अधोरेखित झाले आहे. शांतता, सुरक्षा, विश्वास यांचा अभाव हीच या भागातील मोठी आव्हाने आहेत. याचे मूळ कारण वाढता मूलतत्त्ववाद हे आहे. अफगाणिस्तानात याचे प्रत्यंतर आले असून शांघाय कोऑपरेशन कार्पोरेशन या संस्थेने याबाबत एक धोरण चौकट तयार करावी, त्यासाठी इस्लामशी संबंधित परंपरा, सर्वसमावेशक संस्था, सहिष्णुता, नेमस्तपणा या तत्त्वांचा आधार घेण्याची गरज आहे. मूलतत्त्ववादाविरोधातील लढाई ही प्रादेशिक सुरक्षिततेसाठीच नव्हे तर विश्वासासाठीही उपयुक्त आहे. त्यांनी इराणचे नवीन सदस्य म्हणून स्वागत केले आहे. भारत मध्य आशियाशी संपर्क प्रस्थापित करण्यास उत्सुक आहे. पण या आंतरजोडणीत एक मार्गी संवाद किंवा सहकार्य उपयोगाचे नाही. सल्लामसलत, पारदर्शकता व सहभाग या तत्त्वांवर आधारित असे सहकार्य यात अपेक्षित आहे. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान