Rohit Pawar Post on S-400 Manohar Parriakar : पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनेने पहलगाम येथे हल्ला घडवून आणल्यानंतर भारताने ७ आणि ८ मे रोजी पाकिस्तानी दहशतवादी तळांवर प्रतिहल्ले करून चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रत्युत्तर देणार याची कल्पना भारताच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाला होतीच. त्यामुळे या ड्रोन हल्ल्याला कुचकामी ठरवण्यासाठी भारताने ड्रोन व क्षेपणास्त्र बचाव प्रणाली सज्ज ठेवली. रशियाने भारताला दिलेल्या एस-४०० क्षेपणास्त्र बचाव प्रणाली अर्थात ‘सुदर्शन चक्रा’ने पाकिस्तानचे कुटिल मनसुबे हाणून पाडताना, भारतीय सैनिक आणि लष्करी इमारतींचे रक्षणही केले. या एस-४०० क्षेपणास्र बचाव प्रणालीची सर्वत्र चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी दिवंगत माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण काढली आहे.

रशियाने भारताला ‘एस-४०० ट्रायन्फ’ ही क्षेपणास्त्र बचाव प्रणाली गेल्या वर्षी दिली. जगातील अत्यंत मोजक्याच देशांकडे अशा प्रकारची प्रणाली आहे. ही प्रणाली भारताने रशियाकडून घेऊ नये अशी विनंती युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने केली होती. पण या विनंतीला प्रतिसाद न देता, भारताने स्वयंबचावाला प्राधान्य दिले. पण याचा करार मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री असताना झाला होता. याबाबत रोहीत पवारांनी खास पोस्ट केली आहे.

रोहित पवार म्हणाले, “काल रात्री पाकिस्तानने अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले, परंतु आपल्या सैन्याने एस-४०० या अत्यानुधिक एअर डिफेन्सच्या मदतीने सर्व ड्रोन पाडले, शिवाय पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाईल देखील पाडल्या आहेत. पाकिस्तानचे नापाक इरादे उधळून लावणाऱ्या S-400 आपल्या सरकारने यंत्रणेत समाविष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका आणि दूरदृष्टी होती स्व. मनोहर पर्रिकर साहेबांची. स्वतः इंजिनियर असलेल्या पर्रिकरांनी त्यांच्या सरक्षणमंत्रीपदाच्या २०१४ ते २०१७ च्या काळात त्यांनी भविष्यातील गरज लक्षात घेऊन S-400 सारखे अनेक महत्वपूर्ण करार पूर्णत्वास नेले. त्यांची दूरदृष्टी कायमच स्मरणात राहील.”

एस-४०० ची वैशिष्ट्ये

एस-४०० सुदर्शन चक्र प्रणाली ४०० किलोमीटर दूरवरून येणाऱ्या लक्ष्याला नष्ट करू शकते आणि ६०० किलोमीटरवर असलेल्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते. या प्रणालीमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत. लढाऊ विमानांपासून ड्रोनपर्यंत आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून क्रूझ क्षेपणास्त्रांपर्यंत कोणत्याही वस्तूचा वेध ही प्रणाली घेऊ शकते. ही क्षमता तिला वैविध्यपूर्ण आणि अतिशय उपयुक्त बनवते. ए-४०० सुदर्शन चक्रावर अत्याधुनिक रडारयंत्रणा कार्यान्वित असते. एकाच वेळी १०० विविध लक्ष्यांचा वेध घेण्याची या यंत्रणेची क्षमता आहे. ही मोबाइल लाँचरवर बसवलेली असल्यामुळे तीस लवचीकता प्राप्त होते. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षणी तिची हालचाल करता येऊ शकते. लष्करी आस्थापना आणि नागरी वस्त्यांचे रक्षण करण्याची ती क्षमता भारताला अभेद्य बनवते. शिवाय तिचे इलेक्ट्रॉनिक जॅमिंग करून तिला निरुपयोगी बनवणे जवळपास अशक्य आहे.