अमृतसरमध्ये असलेले सुवर्ण मंदिर हे देशात आणि जगभरात प्रसिद्ध आहे, या ठिकाणी असलेल्या लंगर अर्थात मोफत भोजनाच्या सेवेवर जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करामुळे १० कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. जगभरातले सर्वात मोठे स्वयंपाक घर याठिकाणी आहे असे मानले जाते कारण सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसात या ठिकाणी रोज सुमारे ५० हजार भाविक भोजन करतात, तर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी ही संख्या १ लाख किंवा त्याच्याही वर जाते. जीएसटी लागू झाल्याने या लंगरवर १० कोटी रूपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. सुवर्ण मंदिरातले लंगर ही अशी जागा आहे जिथे आलेला माणूस कधीच उपाशी जात नाही.

1

लंगरचा भटारखाना किंवा स्वयंपाकघर २४ तासांपैकी फक्त २ तास बंद असते. या लंगरमध्ये भाविकांसाठी तयार होणाऱ्या पोळ्यांसाठी ७ हजार किलो पीठ, १२०० किलो तांदूळ, १३०० किलो डाळ आणि ५०० किलो तूप लागते. लंगरमध्ये जे जेवण तयार होते ते तयार करण्याचा वार्षिक खर्च साधारण ७५ कोटींच्या घरात आहे. मात्र आता जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर तुपावर १२ टक्के जीएसटी, साखरेवर १८ टक्के जीएसटी आणि विविध प्रकारच्या डाळींवर ५ टक्के जीएसटी लागू झाला आहे. त्याचमुळे लंगरमध्ये तयार होणाऱ्या जेवणाच्या खर्चावर १० कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

2

लंगरसाठी जो स्वयंपाक केला जातो त्यासाठी दररोज सरासरी १०० गॅस सिलेंडर्स वापरले जातात, ५ हजार किलो किंवा त्याहीपेक्षा जास्त लाकडेही जळणाचे साधन म्हणून खर्च होतात. तसेच या गुरूद्वाऱ्यात मशीनच्या मदतीने दर तासाला सुमारे २५ हजार पोळ्या तयार केल्या जातात. लंगरमध्ये मिळणारे जेवण हे संपूर्ण शाकाहारी असते.

लंगरच्या स्वयंपाक घरात तब्बल ४५० कर्मचारी काम करतात, त्यांच्या मदतीसाठी १०० स्वयंसेवक हजर असतात. हे स्वयंसेवक भाविकांना जेवण वाढण्यासोबतच रोज सुमारे ३ लाख भांडी घासण्याचेही काम करतात. एक ताट पुन्हा वापरण्याआधी एक दोनवेळा नाही तर ५ वेळा धुतले जाते, दररोज या लंगरमध्ये ७ क्विंटल दूधही वापरले जाते. सुवर्ण मंदिरात येणारी कोणतीही व्यक्ती मोफत भोजन करू शकते. आता जीएसटीमुळे या लंगरवर १० कोटी रूपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

3

कशी सुरू झाली लंगरची प्रथा?

शीख धर्मगुरू गुरूनानक यांनी १५ व्या शतकात लंगरची प्रथा सुरू केल्याचे बोलले जाते. आपल्या एका उपदेशादरम्यान त्यांनी एकता आणि बंधुभाव जपण्याचा संदेश दिला, ज्यानंतर ही प्रथा सुरू झाली. गुरूनानक हे स्वतः त्यांच्या सहकाऱ्यांसोबत जमिनीवर बसून जेवण करत असत. कोणत्याही धर्माच्या लोकांसोबत बसून ते जेवत असत. जात-पात- धर्म हे विसरण्यासाठी कोणत्याही माणसाने सोबत यावे आणि जेवावे असा त्यामागचा उद्देश होता. सुवर्ण मंदिरात आजही ही परंपरा पाळली जाते आहे. या ठिकाणी कोणत्याही धर्माच्या माणसाला भोजन करण्याची मुभा आहे. १५ व्या शतकापासून सुरू असलेली ही प्रथा आजही अवितरपणे सुरू आहे.